---Advertisement---

अंबाती रायुडूचा खळबळजनक खुलासा! BCCIवर गंभीर आरोप करत फोडलं 2019 वर्ल्डकपचं भांडं

On: गुरूवार, जून 15, 2023 11:09 AM
Ambati-Rayudu
---Advertisement---

भारतीय संघाचा अनुभवी फलंदाज अंबाती रायुडू हा सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. कारण, त्याने विश्वचषक 2019 स्पर्धेदरम्यान त्याच्यासोबत झालेल्या अन्यायामागे बीसीसीआयचे धक्कादायक गुपीत सांगितले आहे. रायुडूने बीसीसीआय आणि भारतीय संघाच्या निवडकर्त्यांवर खळबळजनक आरोप केले आहेत. त्याने 2019च्या विश्वचषकादरम्यान संघाच्या निवडीत आतापर्यंत झालेल्या सर्वात मोठ्या चुकीविषयी भाष्य केले आहे. खरं तर, रायुडू विश्वचषकादरम्यान भारतीय संघातील राजकारणाचा बळी ठरला, ज्यामुळे त्याने लगेच आंतरराष्ट्रीय निवृत्तीची घोषणाही केली होती.

अंबाती रायुडूचा खळबळजनक खुलासा
अंबाती रायुडू (Ambati Rayudu) याने माध्यमांशी बोलताना खळबळजनक खुलासा केला. त्याने म्हटले की, “2018मध्ये बीसीसीआयच्या अधिकाऱ्यांनी मला 2019 विश्वचषकासाठी तयार राहण्यासाठी सांगितले होते. मात्र, अचानक माझ्या जागी चौथ्या क्रमांकावर फलंदाजीसाठी दुसऱ्या फलंदाजाला नाही, तर एका अष्टपैलू खेळाडूला निवडले होते. तुम्ही विश्वचषकासाठी भारतीय संघ निवडला आहे की कोणत्या लीग सामन्यासाठी संघ निवड केली आहे. जर 2019 विश्वचषकात निवडकर्त्यांनी अजिंक्य रहाणेसारख्या अनुभवी आणि वरिष्ट खेळाडूला माझ्या जागी घेतले असते, तर समजले असते. मात्र, चौथ्या क्रमांकासाठी त्यांनी माझ्या जागी एका अष्टपैलूला निवडले, ज्यामुळे मला राग आला होता.”

काय आहे सत्य?
खरं तर, विश्वचषक 2019 (World Cup 2019) स्पर्धेपूर्वी भारतीय संघ चौथ्या क्रमांकाच्या खेळाडूच्या शोधात होता, ज्याची कमतरता रायुडूने पूर्ण केली होती. मात्र, जेव्हा 2019 विश्वचषकासाठी संघ निवडला गेला, तेव्हा रायुडूला अचानक दुर्लक्षित केले गेले आणि त्याच्या जागी अष्टपैलू विजय शंकर (Vijay Shankar) याला संधी दिली. 2019 विश्वचषकात रायुडू भारतीय संघात चौथ्या स्थानी फलंदाजी करण्यासाठी प्रबळ दावेदार होता. रायुडूला 2019मध्ये अचानक निवडकर्त्यांनी संघाबाहेर केले. त्यानंतर रायुडूने या निर्णयाचा विरोध करत क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्तीची घोषणा केली.

निवडकर्त्यांवर टीकास्त्र
आयसीसी विश्वचषक 2019 स्पर्धेदरम्यान रायुडूच्या जागी विजय शंकर याला संघात केले होते. त्याच्याविषयी मुख्य निवडकर्ते एमएसके प्रसाद यांनी म्हटले होते की, तो संघाला 3D ऑप्शन (फलंदाजी, गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षण) देईल. यावर रायुडूने निवडकर्त्यावर टीकास्त्र डागत ट्वीट करत लिहिले होते की, “मी विश्वचषक पाहण्यासाठी 3D चष्म्याची जोडी ऑर्डर केली आहे.”

यानंतर रायुडूला विजय शंकर आणि शिखर धवन यांच्या दुखापतग्रस्त झाल्यानंतरही संघात संधी मिळाली नव्हती. रायुडूने भारताकडून 55 वनडे सामने खेळले आहेत. यात त्याने 47.06च्या सरासरीने 1694 धावा केल्या आहेत. यामध्ये 3 शतके आणि 10 अर्धशतकांचा समावेश आहे. वनडे क्रिकेटमध्ये रायुडूची सर्वोत्तम धावसंख्या ही 124 इतकी आहे. याव्यतिरिक्त रायुडूने 6 आंतरराष्ट्रीय टी20 सामने खेळताना 42 धावाही केल्या आहेत. (former cricketer ambati rayudu accuses ex bcci president of ruining his career they hurt mentally)

महत्वाच्या बातम्या-
रैनासोबत घाणेरडी चेष्टा! LPLसाठी केली नव्हती नोंदणी, तरीही लिलावात आलं नाव; पण…
‘वनडे विश्वचषकात टॉप-4मध्ये पोहोचणार पाकिस्तान’, दिग्गजाचा मोठा दावा

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---