रविवारी (२८ मार्च) पार पडलेल्या भारत आणि इंग्लंड यांच्यातील तिसऱ्या वनडे सामन्यात भारतीय संघाने ७ धावांनी विजय मिळवला आहे. या विजयासोबतच भारतीय संघाने ही मालिका २-१ ने आपल्या नावावर केली आहे. या मालिकेत देखील युवा यष्टीरक्षक फलंदाज रिषभ पंत याने आपल्या फलंदाजीने सर्वांचेच लक्ष वेधून घेतले आहे. तसेच या युवा खेळाडूचे सर्वत्रच कौतुक केले जात आहे. इंग्लिश संघाच्या माजी कर्णधाराने देखील त्याचे कौतुक करत मोठे विधान केले आहे.
रिषभ पंतने ऑस्ट्रेलिया दौऱ्यापासूनच भारतीय संघाच्या विजयात महत्वाची भूमिका बजावली आहे. ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर केलेल्या उल्लेखनीय कामगिरीच्या जोरावर त्याची इंग्लंड संघाविरुद्ध होणाऱ्या मायदेशातील मालिकांसाठी भारतीय संघात निवड करण्यात आली होती. या मालिकेत देखील त्याने धावांचा पाऊस पाडला.
इंग्लंड संघाविरुद्ध झालेल्या तिसऱ्या वनडे सामन्यात त्याने ७८ धावांची महत्वपूर्ण खेळी केली. या खेळीच्या जोरावर भारतीय संघाला ३२९ धावांचा डोंगर उभारता आला. या सामन्यानंतर माजी इंग्लिश कर्णधार इयान बेल याने रिषभचे तोंडभरून कौतुक केले आहे.
इयान बेलने रिषभ पंतला दुर्मिळ प्रतिभेची उपमा देत म्हटले की, “मी त्याच्याशिवाय भारतीय संघाची कल्पनाच करू शकत नाही. असं वाटत आहे की तोच भविष्य आहे आणि तो विश्वस्तरीय खेळाडू बनण्याच्या मार्गावर आहे. मला वाटते की तो दुर्मिळ प्रतिभा असलेला खेळाडू आहे. ही तर त्याची सुरुवात आहे. त्याची कारकीर्द खूप यशस्वी आहे. तो एक अविश्वसनीय खेळाडूच नव्हे तर एक सामना जिंकवणारा खेळाडू देखील आहे.”
तसेच तो पुढे म्हणाला, “त्याच्यासाठी ही एक उत्कृष्ट मालिका होती. त्याने खेळाच्या तीनही प्रकारात उल्लेखनीय कामगिरी केली. मी त्याच्यात शांत चित्तीने फलंदाजी करणारा फलंदाज पहिला. त्याने धोकादायक शॉट्स खेळायचे टाळले. यासोबतच त्याने स्ट्राईक देखील रोटेट केली. गोलंदाज हाच विचार करत असतील की, त्यांनी जर चूक केली तो त्यांना सोडणार नाही.”
पंतने इंग्लंडविरुद्ध कसोटी मालिकेत ४ सामन्यात २७० धावा, टी२० सामन्यांच्या मालिकेत १०२ धावा आणि वनडे मालिकेत २ सामन्यांत १५५ धावा केल्या आहेत.
महत्त्वाच्या बातम्या –
मोठी बातमी! रोड सेफ्टी सिरीज नडली? सचिनचा युसूफ, बद्रीनाथपाठोपाठ तिसरा संघसहकारी कोरोना पाॅझिटीव्ह
मंडळी राहुल द्रविडला मराठीत बोलताना ऐकलंय का? नसेल तर पाहा ‘हा’ व्हिडीओ
भारत विरूद्ध इंग्लंड मालिकेच्या निकालाने चार आयपीएल संघ असतील खुश, कारण आहे खास