भारत विरूद्ध इंग्लंडची तीन वनडे सामन्यांची मालिका काल संपुष्टात आली. या मालिकेतील शेवटचा सामना काल पुण्याच्या महाराष्ट्र क्रिकेट स्टेडियमवर खेळवला गेला, ज्यात भारतीय संघाने ७ धावांनी विजय मिळविला. या सामन्यातील विजयासह भारताने मालिका देखील २-१ अशा फरकाने खिशात घातली.
दरम्यान, या मालिकेनंतर सगळे भारतीय खेळाडू आता ९ एप्रिलपासून सुरू होणार्या आयपीएलच्या तयारीला लागतील. याच पार्श्वभूमीवर वनडे मालिकेचा निकाल भारतीय संघाच्या बाजूने लागल्याने चार आयपीएल संघ नक्कीच खुश असतील. चला तर जाणून घेऊया, काय असेल यामागील कारण.
चार आयपीएल संघ आणि चार भारतीय खेळाडू
आत्ताच्या वनडे मालिकेत भारताच्या विजयात काही खेळाडूंची महत्त्वाची भूमिका राहिली. हेच खेळाडू आता आयपीएलमध्ये काही संघांचे कर्णधारपद सांभाळणार असल्याने हे संघ नक्कीच आनंदी झाले असतील. यातील पहिले नाव आहे ते म्हणजे भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली. कोहली आयपीएलमध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगलोर संघाचे प्रतिनिधित्व करतो, तसेच या संघाचे नेतृत्व देखील सांभाळतो. कोहलीच्या नुकत्याच संपलेल्या वनडे मालिकेतील प्रदर्शनाने बंगलोरचा संघ नक्कीच आनंदित असेल. कारण या मालिकेत कोहलीने आपला फलंदाजीतील फॉर्म तर परत मिळवलाच, पण त्याशिवाय नेतृत्व कौशल्य देखील सिद्ध केले.
बंगलोर नंतर दुसरा आनंदी संघ असेल तो म्हणजे मुंबई इंडियन्स. मुंबई इंडियन्सचे कर्णधारपद सांभाळणाऱ्या रोहित शर्माने इंग्लंड विरुद्धच्या मालिकेत जबरदस्त प्रदर्शन केले. त्याने कसोटी, टी२० आणि वनडे, अशा तीनही प्रकारांत आपल्या फलंदाजीची छाप सोडली. याशिवाय कोहलीच्या अनुपस्थितीत नेतृत्व सांभाळतांना त्याने आपल्या लौकिकाला साजेशी कामगिरी केली.
यानंतर यंदाच्या आयपीएल हंगामात नव्या नावासह उतरणाऱ्या पंजाब किंग्जच्या संघासाठी देखील या मालिकेतून खुशखबरी समोर आली. पंजाब किंग्जचा कर्णधार केएल राहुल सुरुवातीला टी२० मालिकेत खास कामगिरी करू शकला नाही. त्या मालिकेतील खराब कामगिरीने त्याला संघाबाहेर काढण्याची देखील चर्चा सुरू झाली होती. मात्र त्याने वनडे मालिकेत पुनरागमन करत शतक झळकावत आपण फॉर्मात परत आल्याचे संकेत दिले.
आणि या तीन संघांशिवाय जो संघ आनंदित असेल, तो म्हणजे मागील हंगामात उपविजेता ठरलेला दिल्ली कॅपिटल्स. खरंतर इंग्लंडविरुद्धच्या पहिल्याच वनडे सामन्यात भारताचा फलंदाज आणि आयपीएल मध्ये दिल्लीचे कर्णधारपद सांभाळणारा श्रेयस अय्यर फिल्डिंग करतांना दुखापतग्रस्त झाला होता. त्याच्या दुखापतीच्या पुढील चाचण्या केल्यावर तो यंदाच्या आयपीएल मधील सुरुवातीच्या काही सामन्यांना मुकणार असल्याचे स्पष्ट झाले होते. त्यामुळे दिल्ली कॅपिटल्स साठी मोठा धक्का होता.
मात्र त्याच्या जागी नेतृत्वाचा पर्याय असणार्या रिषभ पंतने दमदार कामगिरी केल्याने दिल्लीची चिंता काहीशी कमी झाली असेल. त्यामुळे आता देशाकडून खेळतांना उत्तम कामगिरी करणारे हे खेळाडू, आयपीएलच्या संघांना जेतेपद पटकावून देणार का, याकडे आता सगळ्यांचे लक्ष असेल.
महत्त्वाच्या बातम्या –
अन् दहा वर्षापूर्वीच्या धोनीच्या टीम इंडियाचा बदला विराटच्या टीम इंडियाने पूर्ण केला
व्हिडिओ : “मोहाला करा मित्र आणि…”, आयपीएलच्या जाहिरातीत दिसला रोहित शर्माचा हटके अंदाज
कसोटी क्रिकेटमध्ये पुनरागमनाबद्दल भुवनेश्वर कुमार म्हणाला, ‘माझे ध्येय कसोटीमध्ये परत येणे आहे, पण…