भारत आणि इंग्लंड यांच्यात झालेल्या पहिल्या वनडे सामन्यात भारतीय संघाने इंग्लंड संघावर ६६ धावांनी विजय मिळवला आहे. या विजयानंतर भारतीय संघाने या मालिकेत १-० ने पुढाकार घेतला आहे. या सामन्यातून पदार्पण करणाऱ्या कृणाल पंड्या आणि प्रसिद्ध कृष्णा यांनी देखील भारतीय संघाच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावली आहे. तसेच गेल्या काही सामन्यांपासून धावा करण्यात अपयश येत असलेल्या केएल राहुलने देखील या सामन्यात अर्धशतकीय खेळी केली आहे. या सामन्याच्या पूर्वसंध्येला कर्णधार विराट कोहली याने केएल राहुलला समर्थन देत एक वक्तव्य केले होते. ज्यावर संजय मांजरेकर यांनी ट्विट करत संताप व्यक्त केला आहे.
इंग्लंड विरुद्ध झालेल्या टी२० मालिकेत केएल राहुलला पहिल्या ४ टी२० सामन्यात संधी देण्यात आली होती. परंतु त्याला या सामन्यांमध्ये मोठ्या धावा करण्यात अपयश आले होते. त्यांनतर राहुलवर सर्वच स्तरातून टीका केली जात होती.
पहिल्या वनडे सामन्याच्या पूर्वसंध्येला झालेल्या पत्रकार परिषदेत विराट कोहलीने राहुलचा बचाव करत म्हटले होते की,”माझ्या कारकीर्दीच्या पहिल्या दिवसापासून ते आजपर्यंत या बाह्य गोष्टी माझ्यासाठी केवळ मूर्खपणाच्या ठरल्या आहेत. बाहेरील लोक काय म्हणतात, ते का बोलतात किंवा ही गोष्ट बोलण्याचे खरे कारण काय आहे? या सर्व बाह्य गोष्टींना बाहेर राहू दिले पाहिजे, आम्ही आमच्या खेळाडूंचे समर्थन करतो आणि करत राहू, तसेच या गोष्टीही खेळाडूंच्या मनावर येऊ नयेत म्हणून आम्ही प्रयत्न करत असतो.”
यावर माजी भारतीय क्रिकेटपटू संजय मांजरेकर यांनी ट्विट करत आपला संताप व्यक्त केला आहे आणि त्यांनी विराटला सल्ला देखील दिला आहे. ते आपल्या ट्विटमध्ये म्हणाले, “विराटने शांततेत आणि परिपक्वताने ही जुनी वास्तविकता स्वीकारण्यास शिकले पाहिजे. विराटने असे नाही म्हटले पाहिजे की, बाहेरील लोक म्हणतात ते मूर्खपणा आहे,त्यांच्या बोलण्याकडे लक्ष नाही दिले पाहिजे. लोक नेहमी तुमच्या प्रदर्शनानुसार तुम्हाला बोलत असतात. तुम्ही जेव्हा वाईट कामगिरी करतात तेव्हा ते वाईटच बोलतात आणि चांगली कामगिरी केली तर स्तुती देखील करतात.”
Outside talk which Virat calls nonsense is basically public reacting to a public performance. And it’s always been the same- Praise when you do well, critique when you don’t. Virat must learn to accept this age old reality with calmness & maturity. Just like Dhoni did.
— Sanjay Manjrekar (@sanjaymanjrekar) March 23, 2021
राहुलची टी२०मध्ये वाईट कामगिरी
केएल राहुलने इंग्लंडविरुद्धच्या टी२० मालिकेत अनुक्रमे १,०,०,१४ असे मिळून चार सामन्यात केवळ १५ धावाच केल्या. त्यामुळे त्याच्यावर टीका होत होती. पण, त्याने वनडे मालिकेतील पहिल्या सामन्यात अर्धशतकी खेळी करत तो फॉर्ममध्ये आल्याचे दाखवून दिले आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
श्रेयस अय्यरच्या अनुपस्थितीत ‘हे’ खेळाडू आहेत दिल्ली कॅपिटल्सच्या कर्णधारपदाच्या शर्यतीत