इंडियन प्रीमियर लीग २०२१ स्पर्धेतील एलिमिनेटरचा सामना कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर या दोन्ही संघांमध्ये पार पडला. या सामन्यात बेंगलोर संघाला ४ गडी राखून पराभवाचा सामना करावा लागला आहे. यासह बेंगलोर संघाचे जेतेपद मिळवण्याचे स्वप्न पुन्हा एकदा भंगले. हा कर्णधार म्हणून विराट कोहलीचा शेवटचा सामना होता. यानंतर विराट कोहली रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघाचे प्रतिनिधित्व करताना दिसेल परंतु तो या संघाचे नेतृत्व करणार नाही. दरम्यान शेवटच्या सामन्यात देखील त्याने तशीच कामगिरी केली आहे जी, त्याने कर्णधार म्हणून आपल्या पहिल्या सामन्यात केली होती.
नऊ वर्षापूर्वी स्वीकारलेले नेतृत्व
विराट कोहलीने ९ वर्षांपूर्वी म्हणजे २०१३ मध्ये कर्णधार म्हणून पदार्पण केले होते. या ९ वर्षात त्याला एकदाही रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघाला जेतेपद मिळवून देता आले नाही. आयपीएल २०२० आणि २०२१ स्पर्धेत रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघाने प्लेऑफमध्ये प्रवेश केला. परंतु जेतेपद मिळवता आले नाही. तर विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली बेंगलोर संघाने एकदा आयपीएल स्पर्धेच्या अंतिम फेरीत प्रवेश केला होता.
प्रवास जिथे येऊन सुरू झाला तिथेच येऊन संपन्न झाला
सन २०१३ मध्ये डॅनियल विटोरीने रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघाचे कर्णधारपद सोडल्यानंतर विराट कोहलीला कर्णधारपद देण्यात आले होते. त्याने कर्णधार म्हणून जेव्हा आपला पहिला सामना खेळला होता, त्यावेळी त्याने ३४ चेंडूंमध्ये ३९ धावांची खेळी केली होती. तसेच ११ ऑक्टोबर, २०२१ रोजी जेव्हा त्याने कर्णधार म्हणून आपला शेवटचा सामना खेळला, त्यावेळी देखील त्याने ३९ धावांची खेळी केली. कर्णधार म्हणून विराट कोहलीच्या पहिल्या आणि शेवटच्या सामन्यात समानता पाहायला मिळाली होती. त्याने बेंगलोर संघासाठी आपला डाव ३९ धावांनी सुरू केला होता आणि ३९ धावांवर समाप्त केला आहे. परंतु त्यावेळी त्याने १ चेंडू कमी खेळलेला.
बेंगलोरचा अखेरच्या षटकात पराभव
या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघाने प्रथम फलंदाजी करताना १३८ धावा केल्या होत्या. या धावांचा पाठलाग करताना कोलकाता नाईट रायडर्स संघाकडून शुबमन गिलने २९ धावांची खेळी केली. तर व्यंकटेश अय्यरने २६ धावांचे योगदान दिले होते. या विजयासह कोलकाता नाईट रायडर्स संघाने क्वालिफायर २ मध्ये प्रवेश केला आहे. क्वालिफायर २ मध्ये कोलकाता नाईट रायडर्स संघाचा सामना दिल्ली कॅपिटल्स संघाविरुद्ध होणार आहे. या सामन्यात जो संघ विजय मिळवणार तो संघ अंतिम फेरीत चेन्नई सुपर किंग्स संघाचा सामना करेल.