इंडियन प्रीमियर लीगच्या जेतेपदाला ३ वेळेस गवसणी घालणाऱ्या चेन्नई सुपर किंग्ज संघाला आयपीएलच्या १४ व्या हंगामातील पहिल्याच सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला होता. दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध झालेल्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्ज संघ पराभूत झाला होता. या सामन्यात एमएस धोनी भोपळाही न फोडता माघारी परतला होता. आता माजी भारतीय फलंदाज, गौतम गंभीरने धोनीच्या फलंदाजी क्रमाबाबत वक्तव्य केले आहे.
गंभीरने क्रिकेट लाईव्ह शोमध्ये बोलताना म्हटले की, “एमएस धोनीला वरच्या क्रमांकावर येऊन फलंदाजी करायला हवी. हेच महत्वाचे आहे. आपण नेहमीच म्हणतो की, कर्णधाराने पुढे येऊन लढायला हवं. आता तुम्ही जर ७ व्या क्रमांकावर फलंदाजी करत असाल, तर तुम्ही पुढे येऊन सामना करू शकत नाही. कारण तेव्हा खूप उशीर झालेला असतो.”
तसेच तो पुढे म्हणाला की, “धोनी आता तितका आक्रमक नाही राहिला जितका तो आधी होता. त्याच्यासाठी हे महत्वाचे असेल की, त्याने मधल्या फळीत फलंदाजीसाठी यावं आणि चेंडूवर आपले लक्ष केंद्रित करावे. हा तो एमएस धोनी नाहीये जो ४, ५ वर्षांपूर्वी असायचा. तो आल्या आल्याच मोठा शॉट खेळायला सुरुवात करायचा. माझ्या मते धोनीने चौथ्या किंवा पाचव्या क्रमांकावर फलंदाजी करण्यासाठी यावे.”
पहिल्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्स संघाविरुद्ध पराभवाचा सामना केल्यानंतर, तीन वेळेस आयपीएल विजेता राहिलेला चेन्नई संघ आज (१६ एप्रिल ) वानखेडे स्टेडियमवर पंजाब किंग्ज संघासोबत भिडणार आहे. पंजाब किंग्ज संघाने त्यांच्या पहिल्या सामन्यात राजस्थान रॉयल्स संघाला पराभूत केले आहे, तर चेन्नई सुपर किंग्ज संघ आपल्या पहिल्या विजयाचा प्रतीक्षेत असणार आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
व्हिडिओ: १२ लाखांच्या दंडाच्या भितीने पंतला फुटला घाम; पंचांना म्हणाला, “तो एक मिनिट तुम्हीच घेतला”
निर्णायक क्षणी कर्णधार पंतने अश्विनवर दाखवला नाही विश्वास, इथेच झाली चुक; प्रशिक्षकाची कबुली
“निवृत्तीनंतरही एबी डिविलियर्स पुन्हा खेळणार आंतरराष्ट्रीय क्रिकेट, पण…” प्रशिक्षकाने दिले संकेत






