मुंबई। रविवारी (१५ मे) वानखेडे स्टेडियमवर इंडियन प्रीमियर लीग २०२२ हंगामातील ६२ वा सामना चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध गुजरात टायटन्स पार पडला. या सामन्यात गुजरातने ७ विकेट्सने विजय मिळवला. गुजरातचा हा आयपीएल २०२२ हंगामातील १० वा विजय होता. या विजयासह गुजरातने गुणतालिकेत पहिल्या दोन संघातील स्थान पक्के केले आहे. या विजयानंतर गुजरातचा कर्णधार हार्दिक पंड्या खुश होता. त्याचबरोबर त्याच्यातील नेतृत्व कौशल्य बहरण्यासाठी मुंबई इंडियन्सचे योगदान असल्याचेही त्याने सांगितले.
मुंबई इंडियन्समधील अनुभव आला कामी
सामन्यानंतर हार्दिकला (Hardik Pandya) त्याच्या शानदार नेतृत्वाबद्दल प्रश्न विचारण्यात आला. त्यावर तो म्हणाला, ‘मी आत्तापर्यंत या भूमिकेत चांगली कामगिरी केली, कारण माझ्या आधीच्या फ्रँचायझीमध्ये खेळाडूंवर अनेक जबाबदाऱ्या टाकल्या जायच्या. मी पण त्या जबाबदाऱ्यांचा आनंद घेतला आहे. यामुळे मला कर्णधाराच्या रुपात चांगली मदत झाली. भूतकाळात मी एक खेळाडू म्हणून जे केले, त्याचा अनुभव कर्णधार म्हणून कामी आला.’
हार्दिने गुजरातचे प्रतिनिधित्व करण्यापूर्वी मुंबई इंडियन्सकडून (Mumbai Indians) आयपीएल खेळले आहे. तो २०१५ ते २०२१ पर्यंत मुंबई इंडियन्सकडून खेळला. त्याने मुंबईकडून ९२ आयपीएल सामने खेळताना १४७६ धावा केल्या आणि ४२ विकेट्स घेतल्या आहेत.
जिंकणे महत्वाचे महत्त्वाचे होते
हार्दिक विजयाबद्दल बोलताना म्हणाला, ‘आम्हाला सामना संपवण्याची घाई नव्हती. कारण, त्याचे अतिरिक्त गुण मिळणार नव्हते. आमच्यासाठी विजय महत्त्वाचा होता. आमचे पूर्ण लक्ष याकडेच होते.’
याबरोबर संघात नव्या खेळाडूंना संधी देण्याबद्दल हार्दिक म्हणाला, ‘आम्ही पाहू जर एखाद्या खेळाडूला प्लेऑफसाठी ताजेतवाने होण्यासाठी एखाद्या सामन्याची विश्रांती हवी आहे का? नाहीतर आमच्यासाठी लय कायम राखणे महत्त्वाचे आहे. नक्कीच आम्हाला, नव्या खेळाडूंना संधी द्यायची आहे. पण, आम्हाला हे सुद्धा पाहायचे आहे की, आमचा कोअर ग्रुप संपूर्ण हंगामात खेळेल आणि त्यांना प्लेऑफआधी पुरेसा सराव मिळेल. नक्कीच आम्ही काही बदल करू शकतो, जर वेगवान गोलंदाजांना गरज असेल तर. नाहीतर संघात बदल होण्याची शक्यता कमी आहे.’
गुजरातचा विजय
या सामन्यात (Chennai Super Kings vs Gujarat Titans) चेन्नई सुपर किंग्सने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. पण, फलंदाजीवेळी चेन्नई सुपर किंग्स संघ संघर्ष करताना दिसला. त्यांना २० षटकात ५ बाद १३३ धावाच करता आल्या. चेन्नईकडून ऋतुराज गायकवाडने ४९ चेंडूत ५३ धावांचे योगदान दिले. तसेच एन जगदीशनने नाबाद ३९ धावा केल्या, तर मोईन अलीने २१ धावा केल्या. या व्यतिरिक्त अन्य कोणाला दोन आकडी धावसंख्या गाठता आली नाही. गुजरातकडून मोहम्मद शमीने सर्वाधिक २ विकेट्स घेतल्या.
त्यानंतर १३३ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना गुजरातकडून वृद्धिमान साहाने ५७ चेंडूत नाबाद ६७ धावांची खेळी केली. तसेच शुबमन गिलने १८, मॅथ्यू वेडने २० आणि डेव्हिड मिलरने नाबाद १५ धावांचे योगादान दिले. त्याचबरोबर कर्णधार हार्दिक पंड्याने ७ धावा केल्या. त्यामुळे गुजरातने १३४ धावांचे आव्हान १९.१ षटकात ३ विकेट्स गमावत पूर्ण केले. चेन्नईकडून मथीशा पाथिरानाने सर्वाधिक २ विकेट्स घेतल्या.
महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी लिंकवर क्लिक करा
महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
महत्त्वाच्या बातम्या –
एकीकडे हसू, दुसरीकडे आसू! वानखेडेवर झालेला झाला चेन्नई-गुजरातसाठी विक्रमी, पण…
जयस्वालने असा काही षटकार मारला की, पंचांना मागवावा लागला नवा चेंडू, पाहा Video
अखेर ‘ती’ एक ट्राॅफी जिंकल्यावर क्रिकेटजगताने इंग्लंडची थांबवली होती थट्टा मस्करी