भारतीय संघ २०२०-२०२१ च्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यात तिन्ही प्रकारच्या क्रिकेट सामन्यांची मालिका खेळणार आहे. या दौऱ्यातील वनडे सामन्यांच्या मालिकेला २७ नोव्हेंबरपासून सुरुवात होईल. भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली या दौऱ्यावर चार सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिला सामना खेळून भारतात परतणार आहे. त्याने पालकत्व रजा घेतली आहे. मात्र, त्याच्या अनुपस्थितीत, गोलंदाजी विभागात भारताचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह हा भारतासाठी ‘हुकमी एक्का’ ठरेल, असे ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज जॉश हेजलवूड याला वाटते.
हेजलवूडने केले भारतीय संघाचे कौतुक
क्रिकेट ऑस्ट्रेलियाच्या अधिकृत संकेतस्थळाला दिलेल्या मुलाखतीत हेजलवूडने भारत- ऑस्ट्रेलिया मालिकेसंदर्भात अनेक गोष्टींवर आपली मते मांडली. हेजलवूड म्हणाला, “भारतीय संघाची गोलंदाजी मागील दहा वर्षात कमालीची दर्जेदार बनली आहे. मागील मालिकेत भारताने आम्हाला तिन्ही आघाड्यांवर अक्षरशः मागे टाकले होते.”
बुमराहचे केले विशेष कौतुक
हेजलवूडने भारताचा अव्वल वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह याचे विशेष कौतुक केले. बुमराहच्या गोलंदाजीची प्रशंसा करताना तो म्हणाला, “ऑस्ट्रेलियाला मालिका जिंकायच्या असतील, तर बुमराहला प्रभावी कामगिरी करण्यापासून रोखावे लागेल. तो भारतीय संघाचा सर्वात शानदार गोलंदाज आहे. त्याची गोलंदाजी शैली काहीशी विचित्र आहे. मात्र, त्याचा तो चांगला फायदा उठवतो. कसोटी मालिकेत बुमराहवर विशेष लक्ष ठेवावे लागेल. तो नव्या आणि जुन्या चेंडूने प्रभावशाली गोलंदाजी करतो.”
इशांतमुळे भारतीय गोलंदाजी मजबूत बनेल
दुखापतीमुळे भारताचा अनुभवी वेगवान गोलंदाज इशांत शर्मा याच्या खेळण्यावर प्रश्नचिन्ह आहे. हेजलवूड इशांतविषयी सांगताना म्हणाला, “इशांत भारताचा सर्वात अनुभवी वेगवान गोलंदाज आहे. तो तंदुरुस्त झाला, तर भारताची गोलंदाजी अधिक मजबूत होईल. यावेळच्या भारतीय संघात काही बदल झाले आहेत. मात्र, तरीही भारतीय संघ परिपूर्ण वाटतो.”
ऍशेससोबत केली भारत-ऑस्ट्रेलिया मालिकेची तुलना
हेजलवूडने भारत-ऑस्ट्रेलिया कसोटी मालिकेची तुलना ऍशेस मालिकेशी केली. “भारतीय संघ शेवटच्या वेळी ऑस्ट्रेलियामध्ये आला होता, तेव्हा दोन्ही संघांमधील लढत पाहण्यासारखी झाली होती. आम्ही मायदेशात फारश्या मालिका गमावत नाही. पण, भारताविरुद्ध पराभूत झाल्याची खंत अजूनही आहे. भारत-ऑस्ट्रेलिया यांच्यातील कसोटी मालिकेला आता ऍशेसचे रूप येऊ लागले आहे.”
भारतीय संघाने २०१८-२०१९ च्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर चार सामन्यांच्या कसोटी मालिका २-१ ने विजय मिळवला होता. भारतीय संघाने आजवरच्या इतिहासात फक्त एकदा ऑस्ट्रेलियात कसोटी मालिका विजय मिळवला आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
कसोटी मालिकेपूर्वी टीम इंडियासाठी खुशखबर; ‘हा’ खेळाडू ऑस्ट्रेलियाला जाण्यास सज्ज
कोहलीची अनुपस्थिती ‘या’ खेळाडूसाठी ठरणार सर्वात फायदेशीर, हरभजन सिंगने सांगितले नाव
ट्रेंडिंग लेख-
…अन् धोनीचा सध्या विरोधक झालेल्या खेळाडूलाही धोनीचा ‘रनर’ म्हणून यावे लागले मैदानात
हे तीन परदेशी खेळाडू पुढील आयपीएलमध्ये दिसण्याची शक्यता कमी; दोन माजी कर्णधारांचा समावेश
पॉटींगच्या गोलंदाजी विभागाचा ‘सरसेनापती’ राहिलेल्या ब्रेट लीची अनोखी कहानी