भारताचा वेगवान गोलंदाज एस श्रीसंतने नुकतेच २०१३ च्या आयपीएल स्पॉट फिक्सिंग प्रकरणानंतर काही सेंकदांत त्याचे आयुष्य कसे बदलले याबद्दल खुलासा केला आहे. त्याने म्हटले आहे की तो जेव्हा संघाबरोबर पार्टी करत होता तेव्हा त्याला दिल्ली पोलिसांनी पकडले. त्यानंतर त्याला कसे दहशतवाद्यांच्या वॉर्डात नेले आणि दररोज १६-१७ तास विचारपूस केली.
क्रिकट्रॅकरशी बोलताना श्रीसंत म्हणाला, ‘जर तूम्ही माझ्या आयुष्याकडे पाहिले तर जाणवेल हे सर्व काही सेंकदांत बदलले. आयपीएल सामन्यानंतर संघाची (राजस्थान रॉयल्स) पार्टी सुरु होती. मला थेट दहशदवाद्यांच्या वॉर्डमध्ये घेऊन गेले. मला वाटत होते की मला बकरा बनवले आहे. पुढचे १२ दिवस, माझ्यासाठी रोज १६-१७ तास टॉर्चर होत होते.’
‘मी नेहमी माझ्या घराबद्दल आणि कुटुंबाबद्दल त्यावेळी विचार करायचो. काहीदिवसांनंतर माझा मोठा भाऊ मला भेटायला आला आणि त्यानंतर मला माझे कुटुंब व्यवस्थित असल्याचे कळाले. माझ्या कुटुंबियांनी मला प्रेरणा दिली. ते माझ्या पाठीशी होते.’
२०११ मध्ये भारताकडून शेवटचा सामना खेळलेल्या श्रीसंतने २०१३ च्या स्पॉट फिक्सिंग प्रकरणानंतर कसा संघर्ष करावा लागला याबदद्ल सांगितले की ‘माझ्या कुटुंबासाठी सर्व कठिण होते. आम्ही मंदिरातही जात नव्हतो. मला फिल्मस्टार म्हणून शारजाह स्टेडियमवरही परफॉर्म करण्याचीही परवानगी नव्हती. खूप संघर्ष करावा लागला.’
२०१३ च्या आयपीएलमध्ये राजस्थान रॉयल्सकडून खेळत असताना श्रीसंतला स्पॉट फिक्सिंग प्रकरणी दिल्ली पोलिसांनी अटक केली होती. त्यानंतर बीसीसीआयने त्याच्यावर आजीवन बंदी घातली होती.
परंतु, मार्च २०१९ मध्ये सर्वोच्च न्यायालयाने बीसीसीआयच्या अनुशासन समीतीला श्रीसंतच्या बंदीचा कालावधी कमी करण्यास सांगितले होते. त्यामुळे २०१९ मध्ये त्याच्या बंदीचा कालावधी ७ वर्षांचा करण्यात आला होता. त्यामुळे आता १३ सप्टेंबर २०२० ला त्याच्या बंदीच्या ७ वर्षांचा कालावधी पूर्ण होणार आहे.
त्यामुळे त्याला क्रिकेटमध्ये पुनरागमन करण्याची संधी आहे. त्याने आता आयपीएलमध्ये आणि भारताकडूनही खेळण्याची इच्छाही व्यक्त केली आहे. त्याने म्हटले आहे की आयुष्यात पुढे जायला पाहिजे.
तो म्हणाला, ‘प्रत्येक युद्ध जिंकणे महत्त्वाचे आहे, प्रत्येकजण आपापले वेगळे युद्ध लढत असतात. अगदी सचिन तेंडुलकरने एका सामन्यात शतक केले तरी त्याला पुढच्या सामन्यात शुन्यापासून सुरुवात करावी लागते. कोणताही निर्णय घेण्याआधी १० सेकंद विचार करा, तूम्हाला हे माहित पाहिजे की ही गोष्ट देखील पार होणार आहे.’
श्रीसंत २००७ टी२० विश्वचषक आणि २०११ मधील वनडे विश्वचषक विजेत्या भारतीय संघाचा भाग राहिला आहे. त्याने त्याच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीत २७ कसोटीत ८७ विकेट्स तर ५३ वनडे सामन्यात ७५ विकेट्स त्याने घेतल्या आहेत.
ट्रेंडिंग घडामोडी –
ब्रॅड हॉगच्या मते ‘हा’ विकेटकिपर आहे धोनीचा उत्तराधिकारी
कोरोना इफेक्ट: क्रिकेटमध्ये विकेट घेतली रे घेतली की असं करायचं सेलिब्रेशन, पहा व्हिडिओ
आयपीएल नाही झाली म्हणून काय झालं, ऑगस्टमध्ये होणार ही मोठी प्रीमीयर लीग