---Advertisement---

ब्रेकिंग! २०२१ टी२० विश्वचषकाचे वेळापत्रक जाहीर, ‘या’ तारखेपासून होणार सामन्यांना सुरुवात

On: मंगळवार, जून 29, 2021 4:19 PM
---Advertisement---

बहुप्रतीक्षित अशा २०२१ सालच्या टी२० विश्वचषकाचे वेळापत्रक अखेर जाहीर झाले आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद अर्थात आयसीसीने आज या वेळापत्रकाची घोषणा केली. यानुसार १७ ऑक्टोबरपासून या स्पर्धेला सुरुवात होईल. तर १४ नोव्हेंबर रोजी अंतिम सामना खेळवला जाईल. संयुक्त अरब अमिराती अर्थात युएई आणि ओमानमध्ये हे सामने खेळवले जातील.

हा विश्वचषक याआधी भारतात होणार होता. मात्र कोरोनाचे संकट पूर्णपणे टळलेले नसल्याने भारतातील आयोजनावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते. यावर तोडगा म्हणून अखेर भारतीय क्रिकेट नियामक मंडळ अर्थात बीसीसीआयने हा विश्वचषक स्थलांतरित करण्याचा निर्णय घेतला. यानुसार आता युएई आणि ओमानमध्ये ही स्पर्धा आयोजित केली जाईल. मात्र असे असले तरी बीसीसीआयच या स्पर्धेचे यजमानपद भूषवणार, असे बीसीसीआयचा अध्यक्ष सौरव गांगुलीने यापूर्वी स्पष्ट केले आहे.

दरम्यान, युएई आणि ओमानमध्ये सामने खेळवले जाणार असले तरी देखील कोरोनाचा धोका तिथेही काही प्रमाणात कायम असणार आहे. त्यामुळे सुरक्षित वातावरणात स्पर्धा पार पाडण्याचे आव्हान बीसीसीआय आणि आयसीसीपुढे असेल. याबाबत बोलतांना आयसीसीचे मुख्य कार्यकारी अधिकारी जिओफ अलार्डीस म्हणाले, “आम्हाला ही स्पर्धा भारतात झाली असती तर अधिक आनंद झाला असता. मात्र सद्य परिस्थिती पाहून हा निर्णय घेण्यात आला आहे. आम्ही बीसीसीआय, ओमान क्रिकेट बोर्ड आणि युएई क्रिकेट बोर्ड यांच्यासह ही स्पर्धा यशस्वीपणे पार पाडण्याचा प्रयत्न करू. तसेच काही प्रेक्षकांना मैदानात येऊन सामने पाहता यावेत, यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत.”

इंडियन प्रीमियर लीग अर्थात आयपीएल २०२१ च्या हंगामाचे उर्वरित सामने देखील युएईमध्ये खेळवले जाणार आहेत. हे सामने सप्टेंबर-ऑक्टोबर महिन्यात पार पडतील. त्याचे अधिकृत वेळापत्रक जाहीर झाले नसले तरी १० ऑक्टोबर रोजी अंतिम सामना खेळवला जाईल, अशी शक्यता आहे. त्यामुळे खेळाडूंना एका आठवड्याच्या विश्रांतीनंतर टी२० विश्वचषकात सहभागी होता येईल.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---