भारतीय कर्णधार रोहित शर्मासाठी सध्या काहीही चांगलं चाललेलं नाही. कसोटीत रोहितची बॅट बऱ्याच काळापासून शांत आहे. तसेच त्याच्या नेतृत्वगुणांवरही प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहेत. रोहितच्या नेतृत्वाखाली भारतीय संघानं सलग चार कसोटी गमावल्या आहेत. या दरम्यान भारतानं एक कसोटी जिंकली, मात्र त्यात जसप्रीत बुमराह संघाचा कर्णधार होता. रोहितच्या नेतृत्वाखाली भारतानं घरच्या मैदानावर न्यूझीलंडविरुद्धची कसोटी मालिका 0-3 ने गमावली होती.
ॲडलेड डे-नाईट कसोटीत ऑस्ट्रेलियानं भारतावर 10 गडी राखून मोठा विजय मिळवला. ही कसोटी पूर्ण सात सत्रही चालू शकली नाही. दोन्ही डाव एकत्र करूनही भारताला 85 षटकंही फलंदाजी करता आली नाही. टीम इंडियानं पहिल्या डावात 180 धावा केल्या, तर दुसऱ्या डावात केवळ 175 धावा करत आल्या. ऑस्ट्रेलियासाठी पहिल्या डावात एकट्या ट्रॅव्हिस हेडनं 140 धावा केल्या होत्या. भारतासाठी नितीश रेड्डी (42) हा दोन्ही डावात सर्वाधिक धावा करणारा फलंदाज होता.
जर आपण भारतासाठी सर्वाधिक सलग कसोटी गमावलेल्या कर्णधाराबद्दल बोललो, तर मन्सूर अली खान पतौडी यांचं नाव पहिल्या क्रमांकावर येतं. त्यांनी 1967-68 दरम्यान सलग सहा कसोटी सामने गमावले होते. यानंतर येतो महान फलंदाज सचिन तेंडुलकरचा नंबर, ज्यानं कर्णधार म्हणून सलग पाच कसोटी सामने गमावले आहेत.
भारतासाठी पाच कर्णधारांनी सलग चार कसोटी सामने गमावले आहेत. सर्वप्रथम, 1959 मध्ये दत्ता गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली भारतानं सलग चार कसोटी सामने गमावले. त्यानंतर 2011 आणि 2014 मध्ये एमएस धोनीच्या नेतृत्वाखाली भारतानं सलग चार कसोटी सामने गमावले. धोनी हा एकमेव भारतीय कर्णधार आहे, ज्यानं दोनदा सलग चार किंवा त्याहून अधिक कसोटी गमावल्या. 2020-21 मध्ये विराट कोहली आणि आता 2024 मध्ये रोहितनंही सलग 4 कसोटी गमावल्या आहेत.
हेही वाचा –
चूक कुठे झाली? ॲडलेडच्या लाजिरवाण्या पराभवावर कर्णधार रोहित शर्माची प्रतिक्रिया
IND vs AUS; लाजिरवाण्या पराभवानंतर भारताला WTCच्या गुणतालिकेत मोठा फटका
इंग्लंडने 323 धावांनी उडवला न्यूझीलंडचा धुव्वा! WTCच्या अंतिम शर्यतीतून न्यूझीलंड बाहेर






