ऑस्ट्रेलियामध्ये ऐतिहासिक मालिका विजय मिळवल्यानंतर भारतीय संघासमोर मायदेशात इंग्लंड संघाचे आव्हान असणार आहे. 5 फेब्रुवारीपासून सुरू होणाऱ्या या दौऱ्यात इंग्लंड संघ बहुचर्चित 4 कसोटी सामन्यांची मालिका खेळणार आहे. या मालिकेत भारतीय संघाला विजयाचा दावेदार मानले जात असले; तरी नुकत्याच पार पडलेल्या श्रीलंका दौऱ्यात इंग्लंडने शानदार कामगिरी करत 2-0 ने विजय मिळवला. त्यामुळे आत्मविश्वास वाढलेल्या इंग्लंड संघाकडून भारतीय संघाला सावध राहणे गरजेचे असणार आहे. विशेषतः इंग्लंडचे दोन्ही फिरकीपटू डॉम बेस व जॅक लीच भारतीय संघासाठी डोकेदुखी ठरू शकतात.
डॉम बेस आणि जॅक लीचची कामगिरी
इंग्लंडच्या या दोन्ही फिरकीपटूंनी श्रीलंकेविरुद्ध झालेल्या कसोटी मालिकेत अविश्वसनिय गोलंदाजी केली होती. बेसने 2 सामन्यात 12 तर लीचने 2 सामन्यात 10 बळी मिळवले आहे. म्हणजेच श्रीलंकेच्या एकुण 39 बळींपैकी 22 बळी या दोन फिरकीपटूंनी घेतले आहेत.
बेसने आतापर्यंत 12 आतंरराष्ट्रीय कसोटी सामने खेळले असून त्यात त्याने 31 बळी मिळवले आहेत. तर लीचने देखील 12 कसोटी सामने खेळले असून त्यात 44 बळी मिळवले आहेत. लीचच्या नावे प्रथम श्रेणी क्रिकेट मध्ये तब्बल 303 बळी असून भारतीय फलंदाजांना या दोन्ही फिरकीपटूंविरुद्ध उत्तम रणनिती आखावी लागणार आहे.
इंग्लंडच्या फिरकीपटूंनी आणला होता भारतीय फलंदाजांना घाम!
इंग्लंडचे फिरकीपटू यापूर्वी देखील भारतीय संघासाठी डोकेदुखी ठरले असल्याचे दिसून आले आहे. इंग्लंडने 2012 साली भारतात ऐतिहासिक मालिका विजय मिळवला होता. या मालिकेत इंग्लंडचे फिरकीपटू ग्रॅम स्वान व माँटी पानेसर यांनी शानदार कामगिरी केली होती. स्वानने 4 सामन्यात 20 तर पानेसरने 3 सामन्यात 17 बळी मिळवत इंग्लंड संघाला मालिका विजय मिळवून देण्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती.
लवकरच सुरू होणार भारत विरुद्ध इंग्लंड कसोटी मालिका
भारत विरुद्ध इंग्लंड संघात 5 फ्रेबुवारीपासून चेन्नई येथे पहिला कसोटी सामना खेळला जाणार आहे. 9 फेब्रुवारी रोजी हा सामना संपेल. त्यानंतर 13 ते 17 फेब्रुवारी दरम्यान चेन्नईच्या मैदानावरच दुसरा कसोटी सामना पार पडले. 24 फेब्रुवारी आणि 4 मार्चपासून सुरु होणारे अखेरचे दोन कसोटी सामने अहमदाबाद येथे खेळवण्यात येतील.
महत्त्वाच्या बातम्या-
“टी२० मालिका विजयानंतर विराटच्या ‘त्या’ कृत्याने आणलं डोळ्यात पाणी”, नटराजनने व्यक्त केल्या भावना
“इंग्लंडविरुद्ध कसोटी मालिकेत ‘ही’ गोष्ट केल्यास अर्धी मिशी काढेन”, अश्विनचं पुजाराला अनोखं चॅलेंज






