भारत आणि बांगलादेश यांच्यात बुधवारी (7 डिसेंबर) चाहत्यांना रोमांचक लढत पाहायला मिळाली. भारतीय संघ या सामन्यात 5 धावांनी पराभूत झाला. मात्र, कर्णधार रोहित शर्मा कौतुकास पात्र ठरला. राहुत संघासाठी क्षेत्ररक्षण करताना दुखापत झाली होती. पण तरी देखील त्याने जोखीम पत्करत फलंदाजी केली आणि शेवटच्या चेंडूपर्यंत विजय मिळवण्यासाठी प्रयत्न केला. सामना संपल्यानंतर त्याने स्वतःच्या दुखापतीविषयी महत्वाची माहिती दिली.
भारताने या सामन्यात नाणेफेक गमावल्यानंतर प्रथम गोलंदाजी केली. मैदानात क्षेत्ररक्षणाला उतरल्यानंतर रोहित शर्मा (Rohit Sharma) दुसऱ्याच षटकात दुखापतग्रस्त झाला. त्याच्या डाव्या हाताच्या अंगठ्याला चेंडू लागल्यामुळे त्यातून रक्त आल्याचे चाहत्यांनी पाहिले. दुखापतीनंतर रोहित मैदानातून बाहेर गेला. मात्र, संघाला गरज असताना त्याने फलंदाजी करण्यासाठी मैदानात पुनरागमन केले आणि सामना शेवटच्या चेंडूपर्यंत घेऊन गेला. रोहितने 28 चेंडूत 3 चौकार आणि 5 षटकारांच्या मदतीने नाबाद 51 धावा केल्या. शेवटच्या दोन चेंडूवर संघाला दोन षटकारांचा आवश्यकता होती. अशात पाचव्या चेंडूवर रोहितने षटकार मारला, मात्र शेवटचा चेंडू यॉर्कर असल्यामुळे त्याला षटकार मारता आला नाही.
सामना संपल्यानंतर रोहित माध्यमांशी बोलण्यासाठी आला, तेव्हा त्याने दुखापतीविषयी माहिती दिली. रोहित म्हणाला की, “ही दुखापत जास्त मोठी नाहीये. अंगठा थोडा डिस्लोकेट (जागेवरून हालला आहे) झाला आहे आणि काही टाके देखील पडले आहेत. सुदैवाने फ्रॅक्चर नाहीये आणि त्यामुळे मी फलंदाजी करू शकत होतो.” भारताला या सामन्यात विजयासाठी 272 धावांचे लक्ष्य मिळाले होते, मात्र संघाला विजय मिळवता आला नाही. खेळपट्टी गोलंदाजीसाठी अधिक अनुकूल असल्याचे जाणवले. रोहितला दुखापतीनंतर टाके टाकल्याचे समोर आल्यानंतर तो बांगलादेशविरुद्धच्या एकदिवसीय आणि कसोटी मालिकेतून माघार घेण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
भारतीय संघात मागच्या काही महिन्यांमध्ये खेळाडूंच्या दुखापतीचे सत्र सुरू आहे. अशात याविषयी देखील रोहितने मत व्यक्त केले. “संघातील काही दुखापती चिंताचा विषय आहेत. आम्हाला याच्या मुळाशी जाण्याची गरज आहे. यावर लक्ष द्यावे लागेल. जेव्हा हे खेळाडू भारतासाठी खेळायला येतात, तेव्हा त्यांना 100 टक्क्यांपेक्षा जास्त फिट असावे लागते. कारण देशासाठी खेळताना खेळाडू अर्धा फिट असून चालत नाही,” असे रोहित पुढे बोलताना म्हणाला. दरम्यान उभय संघांतील या सामन्यात रोहित दुखापतग्रस्त झाल्यानंतर काहीच वेळाने वेगवान गोलंदाज दीपक चाहर यालाही दुखापत झाली. चाहरचे हॅमस्ट्रीग दुखावले गेल्याचे सांगितले जात आहे.
तत्पूर्वी वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी याला बांगलादेश दौऱ्यासाठी संघात निवडले होते. पण दुखापतीमुळे त्याचे नाव या दौऱ्यातून कमी झाले. शमीच्या जागी उमरान मिलकला या संघात सामील केले गेले. तसेच मालिकेतील दुसऱ्या वनडे सामन्यापूर्वी कुलदीप सेन दुखापतग्रस्त झाल्याचेही समोर आले. भारतीय संघाचा प्रमुख वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह आणि दिग्गज अष्टपैलू रविंद्र जडेजा हे दोघे देखील दुखापतीच्याच कारणास्तव संघातून बाहेर आहेत. रोहितच्या मते खेलाडूंना होणाऱ्या दुखापती संघासाठी चिंतेची बाब आहे. पुढच्या वर्षी भारतात एकदिवसीय विश्वचषक खेळला जाणार असून संघ आतापासूनच या प्रमुख स्पर्धेच्या तयारीला लागला आहे. (IND vs BAN ODI Series Rohit Sharma injury update)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
ICC Ranking | कसोटीत लाबुशेन टॉपवर, वनडेत श्रेयस अय्यर आणि केएल राहुलला फायदा
चाहत्यांना फक्त कारण पाहिजे ! टी20मध्ये मैदान गाजवणाऱ्या विराटला, वनडेतील कामगिरीमुळे केलं ट्रोल