भारत आणि पाकिस्तान यांच्यातील महिला टी20 विश्वचषक 2026 मधील महामुकाबला आज (14 जून) बर्मिंगहॅममधील इजबेस्टन येथे रंगणार आहे. दोन्ही संघ या सामन्याद्वारे स्पर्धेतील आपल्या मोहिमेची सुरुवात करणार आहेत.
भारत-पाकिस्तान यांच्यातील राजकीय तणावामुळे अनेक वर्षांपासून द्विपक्षीय मालिका खेळल्या जात नसल्याने दोन्ही संघांची गाठ फक्त बहुराष्ट्रीय स्पर्धांमध्येच पडते. दरम्यान, भारतीय संघाने 2025 पासून पाकिस्तानी खेळाडूंशी हस्तांदोलन (हँडशेक) न करण्याची भूमिका कायम ठेवली आहे. याच पार्श्वभूमीवर भारतीय कर्णधार हरमनप्रीत कौरला हँडशेकबाबत प्रश्न विचारण्यात आला.
यावर हरमनप्रीत म्हणाली, “आम्ही येथे क्रिकेट खेळण्यासाठी आलो आहोत आणि संघात इतर कोणत्याही गोष्टीवर चर्चा होत नाही.”
भारत-पाकिस्तान सामन्यात नेहमीच दबाव
महिला टी20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये भारताचे पाकिस्तानविरुद्ध वर्चस्व राहिले असून हेड-टू-हेडमध्ये भारत 13-3 ने आघाडीवर आहे. तर महिला टी20 विश्वचषकात भारताचा 6-2 असा दबदबा आहे. तरीही अशा सामन्यांमध्ये दबाव कायम असतो, असे हरमनप्रीतने मान्य केले.
ती म्हणाली, “लहानपणापासून भारत-पाकिस्तान सामना पाहताना हा दबाव जाणवत आला आहे. आता खेळाडू म्हणून तो अधिक जाणवतो. मात्र आम्ही एकमेकांना हे सामने एन्जॉय करण्याचा सल्ला देतो. शेवटी हा देखील एक क्रिकेट सामना आहे.”
हरमनप्रीतला स्पर्धेची सुरुवात विजयाने करायची असून गेल्या महिला एकदिवसीय विश्वचषकातील यशस्वी कामगिरीची पुनरावृत्ती करण्याचा संघाचा निर्धार आहे.
ती म्हणाली, “पहिला सामना संपूर्ण स्पर्धेचा सूर ठरवतो. आम्ही या सामन्याची आतुरतेने वाट पाहत आहोत आणि सकारात्मक मानसिकतेसह स्पर्धेत उतरणार आहोत.”
भारत आणि पाकिस्तान यांच्यातील हा हायव्होल्टेज सामना क्रिकेट चाहत्यांसाठी पुन्हा एकदा रोमांचक पर्वणी ठरणार आहे.






