सिडनी। ऑस्ट्रेलिया विरुद्ध भारत संघात सुरु असलेल्या ४ सामन्यांच्या कसोटी मालिकेतील तिसरा सामना सिडनी क्रिकेट ग्राऊंड येथे खेळला जात आहे. या सामन्यातील तिसऱ्या दिवशी (९ जानेवारी) भारतीय क्रिकेट संघाने आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेकडे जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद सिराज यांच्याबदद्ल वर्णद्वेषी टीका केल्याची तक्रार केली असल्याची माहिती समोर येत आहे.
माध्यमांतील वृत्तांनुसार सिडनी क्रिकेट ग्राऊंडवर सामना पाहण्यासाठी आलेल्या प्रेक्षकांनी बुमराह आणि सिराज यांना लक्ष्य करत त्यांच्याबद्दल वर्णद्वेषी टीका केली आहे. याबाबत संघाचा कर्णधार अजिंक्य रहाणे आणि आर अश्विन असे काही खेळाडू मैदानावरील पंच पॉल रायफल आणि पॉल विल्सन यांच्याशी चर्चा करत होते, तसेच त्यांनी लक्षात आणून दिली की भारताच्या दोन खेळाडूंना लक्ष्य केले जात आहे.
आता भारतीय संघाने सिडनी क्रिकेट ग्राऊंडच्या अधिकाऱ्यांकडे आणि आयसीसीकडे तक्रार केली आहे. तसेच भारतीय संघव्यवस्थापन या घटनेमुळे नाराज असून त्यांनी हे सर्व अपेक्षित आणि स्विकार्य नसल्याचे म्हटले आहे.
तसेच द टेलिग्राफने दिलेल्या वृत्तानुसार भारतीय संघाने म्हटले आहे की त्या दोघांवर मागील दोन दिवसापासून टिपण्ण्या केल्या जात आहेत.
असेही समोर येत आहे या प्रकरणाबाबत पंचांनी आणि आयसीसी व स्टेडियमच्या सुरक्षा अधिकाऱ्यांनी भारतीय संघाशी चर्चा केली आहे. आता याबाबत काय कारवाई केली जाणार, हे पाहावे लागेल.
तिसऱ्या दिवसाखेर ऑस्ट्रेलिया वरचढ –
सिडनी कसोटीत ऑस्ट्रेलियाच्या पहिल्या डावात ३३८ धावा झाल्या होत्या. त्यानंतर फलंदाजीसाठी उतरलेल्या भारतीय संघाने पहिल्या डावात सर्वबाद २४४ धावा केल्या. त्यामुळे ऑस्ट्रेलियाला ९४ धावांची आघाडी मिळाली. तिसऱ्या दिवसाखेर ऑस्ट्रेलियाने २ बाद १०३ धावा केल्या आहेत. त्यामुळे आता त्यांची आघाडी १९७ धावांपर्यंत वाढली आहे. दरम्यान भारताचे रविंद्र जडेजा आणि रिषभ पंत हे दोन खेळाडू दुखापतग्रस्त झाले असून त्यांना स्कॅनसाठी हॉस्पिटलमध्ये घेऊन जाण्यात आले होते.
महत्त्वाच्या बातम्या –
भारतीय संघाला सिडनी कसोटीच्या तिसर्या दिवशी भोवल्या ‘या’ तीन चुका
सिडनी कसोटीत चेतेश्वर पुजाराने ठोकले २६ वे अर्धशतक, पण ‘हा’ नकोसा विक्रमही केला
ऑस्ट्रेलियन खेळाडूने सिडनी कसोटीत शुबमनला डिवचले; तरीही म्हणाला, “मी काही वाईट बोललो नाही”