टी20 वर्ल्ड कप 2026 च्या सुपर-8 फेरीत अहमदाबाद येथे दक्षिण आफ्रिकेकडून झालेल्या 76 धावांच्या पराभवाने टीम इंडियाच्या रणनीतीवर मोठे प्रश्नचिन्ह उभे केले आहे. सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाला स्पर्धेच्या इतिहासातील सर्वात मोठा पराभव स्वीकारावा लागला. या धक्कादायक निकालानंतर संघ संयोजनात बदल होण्याची शक्यता बळावली असून संजू सॅमसनच्या समावेशाची सर्वाधिक चर्चा होत आहे.
सामन्यानंतर सहाय्यक प्रशिक्षक रायन टेन डोशेट यांनी माध्यमांशी बोलताना मोठा संकेत दिला. गेल्या 18 महिन्यांत सातत्यपूर्ण कामगिरी करणाऱ्या खेळाडूंवर विश्वास ठेवायचा की प्लेइंग इलेव्हनमध्ये बदल करून सॅमसनला संधी द्यायची, यावर पुढील काही दिवसांत सखोल चर्चा होईल, असे त्यांनी स्पष्ट केले. “टॉप ऑर्डरमध्ये उजव्या हाताचा फलंदाज असणे टॅक्टिकलदृष्ट्या फायदेशीर ठरू शकते,” असे ते म्हणाले. त्यामुळे पुढील दोन निर्णायक सामन्यांपूर्वी संघ व्यवस्थापन मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत असल्याचे संकेत मिळत आहेत.
दरम्यान, युवा सलामीवीर अभिषेक शर्मा फूड पॉइजनिंगमुळे त्रस्त होता, अशी माहितीही त्यांनी दिली. सलग तीन वेळा शून्यावर बाद झाल्याने त्याच्यावर मानसिक दबाव वाढल्याचे त्यांनी नमूद केले. मात्र हे कोणतेही कारण पुढे करण्याचा प्रयत्न नसून परिस्थितीची जाणीव असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. तिलक वर्मासह टॉप ऑर्डरवरील फलंदाज अपेक्षेप्रमाणे धावा करू शकले नसल्याने संघ अडचणीत सापडला.
या मोठ्या पराभवामुळे भारताची उपांत्य फेरीची वाट अधिकच कठीण झाली आहे. प्रतिस्पर्धी संघांकडून टॉप ऑर्डरविरुद्ध पार्ट-टाइम ऑफस्पिनरचा प्रभावी वापर होत असल्याने भारतीय फलंदाजीवर दबाव वाढताना दिसत आहे. अशा पार्श्वभूमीवर पुढील सामन्यात सॅमसनला संधी मिळणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. टीम इंडियासाठी आता प्रत्येक सामना ‘करा किंवा मरा’ असा बनला असून व्यवस्थापन कोणता धाडसी निर्णय घेते, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.






