भारत विरुद्ध ऑस्ट्रेलियाच्या चौथ्या आणि शेवटच्या कसोटी सामन्यासाठी भारतीय संघ ब्रिस्बेन येथे पोहोचला आहे. मात्र भारतीय संघ मुक्कामाला असलेल्या हॉटेलमध्ये मुलभूत सोयी-सुविधांचा अभाव असल्याची माहिती आता समोर येत आहे. भारतीय संघाच्या सदस्यांनी याबाबत तक्रार केल्यानंतर बीसीसीआयने यात लक्ष घातल्याचे समजते.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार बीसीसीआयचे अध्यक्ष सौरव गांगुली, सचिव जय शहा आणि सीईओ हेमांग अमीन यांच्याकडे तक्रारी पोहोचविण्यात आल्या होत्या. त्यानंतर बीसीसीआयने क्रिकेट ऑस्ट्रेलियाशी याबाबत संपर्क साधला असून समस्यांचे निवारण करण्याचे आश्वासन क्रिकेट ऑस्ट्रेलियाने दिल्याची माहिती आहे.
बोर्डाच्या एका वरिष्ठ पदाधिकाऱ्याने याबद्दल माहिती देताना सांगितले की, “भारतीय संघ राहत असलेल्या हॉटेलमध्ये रूम सर्विस आणि हाउसकीपिंगची सेवा देखील उपलब्ध नाही. तेथील जिम देखील आंतरराष्ट्रीय दर्जाची नाही, आणि स्विमिंग पूलमध्ये जाणेही शक्य नाही. हॉटेलमध्ये येण्यापूर्वी या सगळ्या गोष्टींचे आश्वासन आम्हाला मिळाले होते.”
भारत आणि ऑस्ट्रेलियाच्या चौथ्या सामन्याला १५ जानेवारीपासून ब्रिस्बेनमध्ये सुरुवात होईल. याआधीच ब्रिस्बेनमधील आयोजनावरून गदारोळ झाला होता. ब्रिस्बेनमधील वाढत्या कोरोना प्रादुर्भावामुळे तेथील विलगीकरणाचे नियम कडक करण्यात आले आहेत. मात्र या नियमांमुळे ब्रिस्बेनमध्ये सामना खेळण्यास भारतीय संघ तयार नसल्याचे वृत्त समोर आले होते. मात्र बरीच भवती न भवती झाल्यानंतर ब्रिस्बेन येथेच सामना होणार असल्याचे निश्चित झाले. ते प्रकरण शांत होत नाही तोच आता हे नवीन प्रकरण उद्भवले आहे.
महत्वाच्या बातम्या:
दीपक हुड्डा-कृणाल पंड्या प्रकरणावर इरफान पठाणने मांडले मत, म्हणाला
भारतीय संघाची दुखापतग्रस्त प्लेईंग इलेव्हन! तब्बल इतक्या खेळाडूंचा समावेश