---Advertisement---

दोन बदलांसह अशी असु शकते दुसऱ्या टी२० सामन्यासाठी टीम इंडिया

---Advertisement---

भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया संघात उद्या(27 फेब्रुवारी) दुसरा आणि शेवटचा टी20 सामना बंगळूरु येथे होणार आहे. या सामन्याला भारतीय प्रमाणवेळे नुसार संध्याकाळी 7 वाजता सुरुवात होणार आहे.

विशाखापट्टणम येथे झालेल्या पहिल्या सामन्यात ऑस्ट्रेलियाने भारतावर 3 विकेट्सने विजय मिळवला होता. या सामन्यात भारताकडून केएल राहुलने सर्वाधिक 50 धावांची खेळी केली. तसेच एमएस धोनीने नाबाद 29 धावा केल्या. मात्र अन्य फलंदाजांना खास काही करता आले नाही.

तसेच गोलंदाजीतही जसप्रीत बुमराह व्यतिरिक्त अन्य गोलंदाजांनी साजेशी अशी कामगिरी केली नाही. त्यामुळे दुसऱ्या सामन्यासाठी 11 जणांच्या भारतीय संघात काही बदल होण्याची शक्यता आहे.

दुसऱ्या टी20 साठी असा असू शकतो 11 जणांचा भारतीय संघ-

सलामीवीर – रोहित शर्मा, शिखर धवन

रोहित शर्माला पहिल्या टी20 सामन्यात खास काही करता आले नव्हते. तो 5 धावा करुन बाद झाला होता. पण रोहित हा भारतीय संघाचा नियमित सदस्य आहे. तसेच त्याचा इतक्या दिवसांचा अनुभव पाहता त्याला दुसऱ्या टी20 साठीही संघात कायम केले जाईल.

शिखर धवनला पहिल्या टी20 सामन्यात विश्रांती देण्यात आली होती. तसेच मागील काही वर्षापासून भारतीय संघाकडून मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्ये रोहित शर्मा आणि शिखर धवन सलामीला फलंदाजी करत आहेत. त्यामुळे  दुसऱ्या सामन्यात मात्र शिखरला पुन्हा संधी दिली जाऊ शकते.

मधली फळी – विराट कोहली, केएल राहुल, रिषभ पंत, एमएस धोनी, दिनेश कार्तिक

भारतीय संघाकडून तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीला येणाऱ्या कर्णधार विराटला पहिल्या सामन्यात चांगल्या सुरुवातीनंतरही मोठी खेळी करण्यात अपयश आले होते. तो 24 धावा करुन बाद झाला होता. पण तरीही त्याच्यावर भारतीय संघ मोठ्या प्रमाणात अवलंबून असणार आहे.

केएल राहुलने पहिल्या सामन्यात अर्धशतकी खेळी करताना भारतीय संघात दमदार पुनरागमन केले होते. त्याला शिखर ऐवजी संधी देण्यात आली होती. त्याचा फायदा घेण्यात त्याला यश आले. पण दुसऱ्या सामन्यात त्याला मधल्या फळीत संधी दिली जाऊ शकते. असे झाल्यास या संधीचा तो कसा उपयोग करतो हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

रिषभ पंतकडूनही पहिल्या सामन्यात मोठ्या आपेक्षा होत्या. मात्र यात तो अपयशी ठरला. तसेच भारतीय संघ व्यवस्थापन मे मध्ये होणाऱ्या विश्वचषकाच्या तयारीच्या दृष्टीने या ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या मालिकेकडे पाहत असल्याने पंतला या मालिकेत चांगली कामगिरी करत विश्वचषकातील स्थान निश्चित करण्याची संधी आहे.

त्याचबरोबर पंतची आक्रमक फलंदाजी भारतासाठी उपयुक्त ठरु शकते. तसेच त्याच्याकडे शेवटच्या काही षटकात फटकेबाजी करण्याची क्षमता आहे.

एमएस धोनीने पहिल्या सामन्यात नाबाद 29 धावा केल्या असल्या तरी त्याला शेवटच्या काही षटकात मोठे फटके खेळण्यात अपयश आले होते. पण त्याच्या या खेळीमुळे भारतीय संघाने महत्त्वाच्या विकेट्स लवकर गेमावल्यानंतरही 126 धावांचा अकडा गाठला होता. त्यामुळे पुढील काही सामन्यांमध्येही धोनीचा फॉर्म आणि अनुभव भारतासाठी महत्त्वाचा ठरणार आहे.

दिनेश कार्तिकला मागील काही सामन्यांप्रमाणेच विशाखापट्टणच्या टी20 सामन्यातही विशेष काही करण्यात अपयश आले नाही. भारताने पहिल्या तीन-चार विकेट्स लवकर गमावल्यानंतर कार्तिकला धोनीबरोबर भक्कम भागीदारी करण्याची संधी होती. पण यातही तो अपयशी ठरला. मात्र तरीही त्याला दुसऱ्या सामन्यात अजून एक संधी दिली जाऊ शकते.

गोलंदाज- युजवेंद्र चहल, मयंक मार्कंडे, सिद्धार्थ कौल आणि जसप्रीत बुमराह

युजवेंद्र चहलला पहिल्या सामन्यात जरी एकच विकेट घेता आली असली तरी त्याने मधल्या काही षटकात ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजांना मोठे फटके मारण्यापासून रोखले होते. तसेच त्याने अर्धशतक करणाऱ्या ग्लेन मॅक्सवेलला बाद केले होते. त्याचबरोबर चहलला बंगळूरुमध्ये खेळण्याचा चांगला अनुभव आहे. त्यामुळे त्याला दुसऱ्या सामन्यातही संधी दिली जाऊ शकते.

मयंकने पहिल्या सामन्यातून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले आहे. मात्र त्याला पदार्पणाच्या सामन्यात विकेट घेण्यात अपयश आले. तसेच त्याने 4 षटकात 31 धावा दिल्या. पण असे असले तरी मयंकची देशांतर्गत क्रिकेटमधील कामगिरी पाहता त्याला अजून एक संधी दिली जाईल.

पहिल्या सामन्यात ऑस्ट्रेलियाला विजयासाठी 14 धावांची गरज असताना उमेश यादवच्या गोलंदाजीवर ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजांनी या धावा काढत विजय मिळवला होता. त्यामुळे उमेशवर मोठ्याप्र माणात टीकाही झाली. तसेच यामुळे त्याला 11 जणांच्या संघातील स्थानही गमवावे लागू शकते. त्याच्या ऐवजी सिद्धार्थ कौलला संधी दिली जाऊ शकते.

जसप्रीत बुमराह हा भारताच्या गोलंदाजीचा सध्या कणा असल्याचे म्हटले जात आहे. त्यामुळे त्याची गोलंदाजी या सामन्यातही महत्त्वाची ठरणार आहे. त्याने पहिल्या सामन्यातही चांगली गोलंदाजी करत तीन विकेट्स घेतल्या होत्या. तसेच भारताच्या विजयाच्या आशाही निर्माण केल्या होत्या. त्यामुळे दुसऱ्या सामन्यातही त्याच्याकडून अशाच चांगल्या खेळाची अपेक्षा सर्वांना असणार आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

पहिल्या टी२० खेळला नाही तरीही या कारणामुळे धवन झाला ट्रोल…

हवाई दलाने दाखवलेल्या शौर्याला या दिग्गज क्रिकेटपटूंकडून सलाम

जेव्हा किंग कोहली साजरा करतो त्याच्या बाॅडीगार्डचा वाढदिवस, पहा व्हीडिओ

 

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---

Leave a Comment