क्रिकेटविश्वातील सर्वात पारंपारिक प्रतिस्पर्धी म्हणून ओळखले जाणारे भारत आणि पाकिस्तान २४ ऑक्टोबर रोजी टी२० विश्वचषकात आमने-सामने येणार आहेत. दुबई येथील दुबई आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर हा सामना खेळला जाईल. हा उभय संघातील टी२० विश्वचषकातील सहावा सामना असेल. या सामन्यापूर्वी खेळलेल्या पाचही सामन्यात भारताने विजय संपादन केला होता. या पाचही सामन्यांविषयी आपण जाणून घेणार आहोत.
२००७ टी२० विश्वचषक-
भारत आणि पाकिस्तान सर्वात प्रथम २००७ टी२० विश्वचषकात आमने-सामने आले. साखळी फेरीतील सामना बरोबरीत सुटल्यानंतर बॉल-आऊट पद्धतीने सामन्याचा निकाल लागला व भारतीय संघाने विजय साजरा केला. त्यानंतर दोन्ही संघांची गाठ अंतिम फेरीत पडली. अखेरच्या षटकापर्यंत रंगलेल्या सामन्यात भारतीय संघाने पाकिस्तानवर विजय मिळवून या पहिल्यावहिल्या स्पर्धेचे विजेतेपद आपल्या नावे केले.
२०१२ टी२० विश्वचषक-
दोन विश्वचषक स्पर्धेत भारत आणि पाकिस्तान यांचा सामना झाला नाही. मात्र, श्रीलंकेत झालेल्या २०१२ टी२० विश्वचषकात दोन्ही संघ सुपर-आठ फेरीत भिडले. एकतर्फी झालेल्या सामन्यात पाकिस्तानने केवळ १२८ धावा बनविल्या होत्या. भारताने विराट कोहलीच्या अर्धशतकाच्या जोरावर दोन गडी गमावून हे आव्हान पार केले.
२०१४ टी२० विश्वचषक-
भारतीय संघाने यानंतर २०१४ टी२० विश्वचषकातही पाकिस्तानला पराभूत केले. ढाका येथे झालेल्या सुपर १० फेरीतील सामन्यात भारतीय संघाने पाकिस्तानवर ७ गडी राखून विजय मिळवला. अमित मिश्रा हा या सामन्याचा मानकरी ठरला होता.
२०१६ टी२० विश्वचषक-
प्रथमच भारतात आयोजित होत असलेल्या टी२० विश्वचषकात भारत आणि पाकिस्तानचा सामना ऐतिहासिक ईडन गार्डन्सवर खेळला गेला. पावसामुळे १८ षटकांच्या झालेल्या सामन्यात पाकिस्तानने प्रथम फलंदाजी करताना केवळ ११८ धावा केल्या. विराट कोहलीने झळकावलेल्या तुफानी अर्धशतकाच्या जोरावर भारताने हा सामना जिंकून पाकिस्तानवर ५-० अशी आघाडी घेतली.
महत्त्वाच्या बातम्या-
भारताविरुद्धच्या ‘हाय व्होल्टेज’ लढतीसाठी पाकिस्तानचा संघ जाहीर, पाहा कोण इन कोण आऊट
‘अरे, हा तर चक्क माही’! धोनीला प्रत्यक्षात पाहून युवा पाकिस्तानी गोलंदाज अतिआनंदीत, साधला संवाद






