भारत आणि श्रीलंका यांच्यातील तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतील दुसरा सामना आज (04 ऑगस्ट, रविवार) होणार आहे. मालिकेतील पहिला सामना बरोबरीत सुटला होता. आता दुसऱ्या सामन्यातून दोन्ही संघांना मालिकेतील पहिला विजय मिळवायचा आहे. आज जर भारतीय संघाने श्रीलंकेविरुद्धचा सामना जिंकला तर टीम इंडिया विजयाचे शतक ठोकेल.
भारत आणि श्रीलंका यांच्यात आतापर्यंत 169 वनडे सामने खेळले गेले आहेत. टीम इंडियाने यापैकी 99 सामने जिंकले आहेत. तर श्रीलंकेने 57 सामने जिंकले आहेत. अशा परिस्थितीत टीम इंडियाने आज विजय मिळवला तर श्रीलंकेविरुद्धच्या वनडेतील विजयाचे शतक पूर्ण होईल. या दोघांमधील एकूण 11 सामने अनिर्णित राहिले असून 2 बरोबरीत सुटले आहेत. 99 सामन्यांमध्ये भारताने घरच्या मैदानावर 40 सामने, 32 आणि 27 तटस्थ सामने जिंकले आहेत.
या दोघांमधील हेड टू हेड पाहता, श्रीलंकेविरुद्ध टीम इंडियाचा दबदबा असल्याचे स्पष्ट होते. अशाप्रकारे आज टीम इंडिया विजयाची प्रबळ दावेदार असल्याचे दिसून येत आहे. आता आज कोणता संघ बाजी मारतो हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.
कोलंबो येथे खेळल्या गेलेल्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात श्रीलंकेने प्रथम फलंदाजी करताना 50 षटकात 230/8 धावा केल्या. त्यानंतर लक्ष्याचा पाठलाग करताना टीम इंडिया 47.5 षटकांमध्ये 230 धावांवर सर्वबाद झाली. अशा प्रकारे दोन्ही संघांचे गुण समान राहिले आणि सामना बरोबरीत सुटला.
भारत आणि श्रीलंका यांच्यातील एकदिवसीय मालिकेतील दुसरा सामनाही कोलंबोमध्ये होणार आहे. या मालिकेतील तिन्ही सामने कोलंबोमध्ये होणार आहेत. पहिल्या सामन्यात कोलंबोतील आर प्रेमदासा स्टेडियमची खेळपट्टी फिरकीपटूंसाठी खूप उपयुक्त ठरली. मात्र, पहिल्या काही षटकांमध्ये वेगवान गोलंदाजाचीही मदत मिळाली. फलंदाजांना धावा काढणे अजिबात सोपे नव्हते. आता दुसऱ्या सामन्यात खेळपट्टी कशी असेल हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.
हेही वाचा-
यजमानांनच वरचढ! ही चूक सुधारली नाही तर श्रीलंका करु शकते चितपट, टीम इंडियासमोर मोठे आव्हान
IND VS SL: दुसऱ्या वनडेपूर्वी संघाला मोठा, स्टार ऑलराउंडर दुखापतीमुळे मालिकेबाहेर
आंतरराष्ट्रीयच नाही तर प्रथम श्रेणी क्रिकटमध्येही ‘हा’ खेळाडू आहे बादशाह!