भारत विरुद्ध न्यूझीलंड या दोन्ही संघांमध्ये टी२० मालिका संपल्यानंतर आता हे दोन्ही संघ कसोटी मालिकेत दोन हात करण्यास सज्ज झाले आहेत. या दोन्ही संघांमध्ये २ कसोटी सामन्यांची मालिका रंगणार आहे. या मालिकेतील पहिला सामना २५ नोव्हेंबर रोजी कानपूरच्या ग्रीन पार्क स्टेडियमवर रंगणार आहे, तर दुसरा सामना ३ डिसेंबर पासून मुंबईमध्ये रंगणार आहे.
हे दोन्ही सामने भारतीय संघासाठी अतिशय महत्वाचे असणार आहेत. कारण भारतीय संघाला जर, विश्व कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या गुणतालिकेत अव्वल स्थानी टिकून राहायचे असेल, तर या मालिकेत विजय मिळवावा लागणार आहे.
असे आहे भारतीय संघाचे वेळापत्रक
भारत विरुद्ध न्यूझीलंड कसोटी मालिका आयसीसी विश्व कसोटी अजिंक्यपद २०२१-२३ स्पर्धेचा भाग आहे. या मालिकेतून हे दोन्ही संघ कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या आपल्या मोहिमेला सुरुवात करणार आहेत. न्यूझीलंड संघाविरुद्ध २ कसोटी सामन्यांची मालिका झाल्यानंतर भारतीय संघ दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर जाणार आहे. या दौऱ्यावर भारतीय संघाला ३ कसोटी सामन्यांची मालिका खेळायची आहे.
त्यानंतर भारतीय संघ श्रीलंका दौऱ्यावर जाईल. श्रीलंका दौऱ्यावर २ सामन्यांच्या कसोटी मालिकेत विजय मिळवणे अवघड काम नाही. परंतु, दक्षिण आफ्रिकेत जाऊन दक्षिण आफ्रिका संघाला पराभूत करणं थोड कठीण आहे. त्यामुळे भारतीय संघ नक्कीच न्यूझीलंड संघाविरुद्ध होणाऱ्या दोन्ही सामन्यात विजय मिळवण्याच्या प्रयत्नात असणार आहे.
तर, दुसरीकडे पाकिस्तान संघ बांगलादेश संघाविरुद्ध कसोटी मालिका खेळण्यात व्यस्त आहे. त्यामुळे बांगलादेश संघाला पराभूत करून पाकिस्तान संघ गुणतालिकेत सर्वोच्च स्थानी पोहचू शकतो. परंतु, जर भारतीय संघाने न्यूझीलंड संघाला २-० ने पराभूत केले तर, भारतीय संघ गुणतालिकेत अव्वल स्थानी टिकून राहू शकतो.
न्यूझीलंडला पराभूत केल्यास मिळणार इतके गुण
आयसीसीच्या नियमानुसार, विश्व कसोटी अजिंक्यपद स्पर्धेत एका सामन्यात विजय मिळवणाऱ्या संघाला १२ गुण दिले जातात. जर भारतीय संघाने न्यूझीलंड संघाला दोन्ही सामन्यात पराभूत केले, तर भारतीय संघ २४ गुणांची कमाई करू शकतो. त्यानंतर दक्षिण आफ्रिका विरुद्ध होणाऱ्या मालिकेत भारतीय संघाला ३६ गुण आणि श्रीलंका संघाविरुद्ध होणाऱ्या सामन्यात २४ गुणांची कमाई करण्याची संधी असणार आहे. गतविजेत्या न्यूझीलंड संघाची जर पराभवाने सुरुवात झाली, तर त्यांच्या अडचणीत वाढ होऊ शकते.
महत्त्वाच्या बातम्या –
भारतीय संघात ‘या’ तिघांचे स्थान सर्वात मजबूत, २०२३ विश्वचषकापर्यंत संघाबाहेर होण्याची शक्यता कमीच
दिग्गज खेळाडूंच्या अनुपस्थितीत कानपूर कसोटीसाठी ‘अशी’ असू शकते टीम इंडियाची ‘प्लेइंग इलेव्हन’
हरमनप्रीत कौरने उंचावली कोट्यवधी भारतीयांची मान! बीबीएल स्पर्धेत पटकावला ‘मोठा’ पुरस्कार