आयपीएल २०२० चा ३० वा सामना बुधवारी (१४ ऑक्टोबर) दुबई येथे दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध राजस्थान रॉयल्स संघात झाला. हा सामना दिल्ली संघाने १३ धावांनी जिंकला. हा दिल्लीचा या हंगामातील सहावा विजय होता. दिल्लीच्या या विजयाचा शिल्पकार एन्रीच नॉर्किए ठरला. त्याला सामनावीर पुरस्काराने गौरविण्यात आले.
नाणेफेक जिंकत दिल्लीचा कर्णधार श्रेयस अय्यरने फलंदाजीचा निर्णय घेतला. कर्णधाराने घेतलेला हा निर्णय संघातील इतर खेळाडूंनी सार्थ ठरवला. प्रथम फलंदाजी करताना दिल्ली संघाने निर्धारित २० षटकात ७ विकेट्स गमावत १६१ धावा कुटल्या. दिल्लीने दिलेल्या या धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना राजस्थान संघाने निर्धारित २० षटकात ८ विकेट्स गमावत केवळ १४८ धावाच केल्या.
राजस्थान संघाकडून फलंदाजी करताना या हंगामातील आपला दुसराच सामना खेळत असलेला अष्टपैलू बेन स्टोक्सने सर्वाधिक धावा केल्या. त्याने ३५ चेंडूत ६ चौकारांच्या मदतीने ४१ धावांची खेळी केली. यासोबतच रॉबिन उथप्पा (३२), संजू सॅमसन (२५) आणि यष्टीरक्षक फलंदाज जॉस बटलरने (२२) धावा केल्या. याव्यतिरिक्त इतर फलंदाजांना २० धावांचा आकडा पार करता आला नाही. त्यात कर्णधार स्टीव्ह स्मिथही अपयशी ठरला. तो केवळ १ धाव करत झेलबाद झाला.
दिल्ली संघाकडून गोलंदाजी करताना तुषार देशपांडे आणि एन्रीच नॉर्किए या धडाकेबाज गोलंदाजांनी प्रत्येकी २ विकेट्स घेतल्या. यासोबतच कागिसो रबाडा, आर अश्विन आणि अक्षर पटेल यांनीही प्रत्येकी एक विकेट आपल्या खिशात घातली.
तत्पूर्वी प्रथम फलंदाजी करताना दिल्ली संघाकडून सलामीवीर फलंदाज शिखर धवनने सर्वाधिक धावा केल्या. त्याने ३३ चेंडूत ५७ धावांची अर्धशतकी खेळी केली. यामध्ये २ षटकार आणि ६ चौकारांचा समावेश होता. यासोबतच कर्णधार श्रेयस अय्यरनेही ५३ धावांची तडाखेबंद अर्धशतकी खेळी केली. या दोघांंव्यतिरिक्त इतर फलंदाज २० धावांच्या आतच गारद झाले.
राजस्थान संघाकडून गोलंदाजी करताना वेगवान गोलंदाज जोफ्रा आर्चरने सर्वाधिक ३ विकेट्स घेतल्या. यासोबतच जयदेव उनाडकटनेही २ विकेट्स आपल्या नावावर केल्या, तर कार्तिक त्यागी आणि श्रेयस गोपाळ यांनी प्रत्येकी १ विकेट घेतली.
दिल्ली संघाला या विजयासह २ गुण मिळाले आहेत. या गुणांचा फायदा घेत दिल्ली संघ गुणतालिकेत अव्वल क्रमांकावर विराजमान झाला आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
-ताशी १५६.२२ Kmph..! दिल्लीच्या गोलंदाजाने फेकला आयपीएलच्या इतिहासातील सर्वात वेगवान चेंडू
-पर्पल आणि ऑरेंज कॅप प्रकरण म्हणजे डोळ्यात धूळफेक, पाहा कुणी केलाय दावा
-ट्वेंटी ट्वेंटीमध्ये ‘जाळ आणि धूर संगटच’ करणारा खेळाडू घेणार पंतची जागा?
ट्रेंडिंग लेख-
-गुळाचे व्यापारी असणाऱ्या कोल्हापूरच्या पाटलाचा मुलगा भारताकडून खेळला अवघा एकच सामना, पण…
-प्रतिभेला संधी हीच तर आयपीएलची खासियत.! एकेकाळचा बॉल बॉय आज बनलाय संघाचा आधार
-भारतीय क्रिकेटचे शापित शिलेदार भाग १७ – क्रिकेटचा गंभीर शिलेदार