ड्वेन ब्रावोला जगातील सर्वोत्तम गोलंदाजांपैकी एक मानले जाते. खासकरुन टी क्रिकेटमधील त्याचा विक्रम उत्तम आहे. ब्रावोने टी२० क्रिकेटमध्ये ५२३ सामन्यांत २० अर्धशतकांच्या मदतीने ६७४७ धावा केल्या आहेत, तसेच ५७४ विकेट्स घेतल्या आहेत. टी२० मध्ये त्याची सर्वोत्कृष्ट धावसंख्या ७० आहे आणि २३ धावा देत ५ विकेट्स घेणे ही त्याची सर्वोत्तम गोलंदाजी कामगिरी आहे. दरम्यान ब्रावो टी२० मध्ये एवढा यशस्वी खेळाडू कसा बनला? याबद्दल त्याने खुलासा केला आहे. त्याने त्याच्या यशाचे सर्व श्रेय युवराज सिंगला दिले आहे.
ब्रावोने (Dwayne Bravo) टी२० मधील आपल्या कामगिरीचे सर्व श्रेय युवराजच्या (Yuvraj Singh) विकेटला दिले आहे. ब्रावोच्या मते २००६ मध्ये एकदिवसीय मालिकेत युवराज सिंगची विकेट घेतल्यानंतर तो जगातील सर्वोत्तम अष्टपैलू बनू शकला. २००६ साली भारतीय संघ वेस्ट इंडिजविरुद्ध दौऱ्यावर गेला होता. जेथे दोन्ही संघांमध्ये चार सामन्यांची कसोटी आणि ५ सामन्यांची एकदिवसीय मालिका खेळली गेली. एकदिवसीय मालिकेत भारतीय संघाला १-४ ने पराभवाचा सामना करावा लागला आणि कसोटीमध्ये त्याला १-० ने विजय मिळाला होता.
या एकदिवसीय मालिकेमध्ये भारतीय संघाने पहिला सामना जिंकला होता. परंतु दूसऱ्या सामन्यात संघाला पराभवाला सामोरे जावे लागले, वेस्टइंडिजने दूसरा सामना जिंकला होता. या सामन्यांच्या विजयाचा स्टार ड्वेन ब्रावो राहिला होता. या सामन्यात भारतीय संघाला ५ चेंडूत १० धावांची गरज होती. युवराज सिंग फलंदाजी करत होता. त्याने दोन चेंडूवर चौकार लगावत सामना भारताच्या दिशेने वळवला होता. भारताला ३ चेंडूत २ धावांची गरज होती. यानंतर ब्रावोने आपल्या चेंडूत बदल केला आणि युवराज सिंगला बाद केले आणि हा सामना वेस्ट इंडिजने विजय मिळवला.
ब्रावो वृत्त वाहिणीशी बोलताना म्हणाला, “युवराज सिंग बाद झाला, यानंतर जगाने पाहिले की माझ्याजवळ गोलंदाजीत विविधता आहे आणि त्यामुळेच माझी टी२० कारकिर्द बदलली.” ३८ वर्षीय ड्वेन ब्रावोने यावर्षी सीएसके संघाकडून खेळत आहे.