आयपीएल म्हणजेच इंडियन प्रिमिअर लीग, ही सद्यमितीस जगातील सर्वात मोठी टी-20 क्रिकेट लीग म्हणून ओळखली जाते. जगभरातील विविध देशातील खेळाडू आयपीएलमध्ये सहभाग घेत असतात. आयपीएलमुळे अनेक खेळाडूंचे नशीब बदलल्याचे आपल्याला पाहायला मिळत आहे.
आयपीएलमध्ये खेळल्यानंतर आंतरराष्ट्रीय सामन्यात देशाचे प्रतिनिधीत्व करण्याची संधी मिळाल्याची अनेक उदाहरणे भारतासह इतर देशांच्या संघांमध्ये आहेत. भारतात तर आयपीएलमध्ये आपल्या खेळाची चुनूक दाखवलेल्या अनेक खेळाडूंचा समावेश त्यानंतर थेट राष्ट्रीय संघातील प्रमुख अकरा खेळाडूंमध्ये केला गेला आहे.
“आयपीएल खेळणारा प्रत्येक खेळाडू एकदा तरी संघासह विजेतेपदावर आपले नाव कोरण्याचे स्वप्न पाहत असतो. यापैकी महेंद्रसिंग धोनी, रोहित शर्मा, गौतम गंभीर या खेळाडूंनी अनेकदा आपल्या संघाला आयपीएलचे विजेतेपद प्राप्त करुन दिले आहे. विराट कोहली मात्र अद्याप आपल्या संघासह आयपीएलच्या विजेतेपदापासून दुर राहिला आहे.”
या लेखात आपण असे काही खेळाडू पाहणार आहोत. ज्यांनी आयपीएलमध्ये अनेक संघांचे प्रतिनिधीत्व केले आहे. तसेच हे सर्वजण भारताच्या राष्ट्रीय संघाकडून खेळलेले दिग्गज खेळाडू आहेत. परंतु, आयपीएलमध्ये अंतिम सामना न खेळताही विजेतेपद प्राप्त केल्याचा अनोखा विक्रम त्यांच्या नावावर आहे. विशेष म्हणजे यातील दोन खेळाडू हे चारवेळा आयपीएलचे विजेतेपद पटकावलेल्या मुंबई इंडियन्स संघातील माजी खेळाडू आहेत.
क्रमांक – 3
- आशिष नेहरा (2016)
आशिष नेहराने आपल्या आयपीएलच्या कारकिर्दीत अनेक संघांचे प्रतिनिधीत्व केले आहे. मुंबई इंडियन्स, पुणे वॉरियर्स, दिल्ली डेअरडेविल्स, चेन्नई सुपर किंग्स, सनरायझर्स हैदराबाद यांसारख्या संघाकडून आशिष नेहरा आयपीएलमध्ये खेळलेला आहे.
आशिष नेहरा 2016 साली सनरायझर्स हैदराबाद संघाकडून आयपीएल खेळत होता. त्याच वर्षी हैदराबाद संघाने आयपीएलचे विजेतेपद पटकावले होते. नेहराने त्यावेळी लीगमध्ये हैदराबाद सनरायझर्स संघाकडून एकूण 8 सामने खेळले होते. ज्यात त्याने 7.65 च्या सरासरीने 9 बळी मिळवले होते. मात्र, जखमी असल्याने हैदराबादचा प्रमुख गोलंदाज असूनही नेहरा अंतिम सामन्यात खेळू शकला नव्हता. नेहरा जरी अंतिम सामन्यात खेळला नसेल, तरिही संघाकडून खेळत असल्याने तो विजेतेपदाचा मानकरी ठरला होता. अशीच गोष्ट नेहराबद्दल २०११ विश्वचषकातही झाली होती. तेव्हाही तो दुखापतीमुळे अंतिम सामन्यातून बाहेर गेला होता.
क्रमांक – 2
- युवराज सिंह (2019)
भारतीय संघाचा माजी महान अष्टपैलू खेळाडू म्हणजेच युवराज सिंह उर्फ युवी, हा टी-20 चा बादशाह म्हणून ओळखला जातो. युवराज आयपीएलमध्येही अनेक संघांकडून खेळलेला आहे. तसेच त्याने आयपीएल कारकिर्दीमध्ये दोन संघांकडून खेळताना विजेतेपद पटकावले आहे.
2016 साली युवराज आयपीएल विजेत्या सनरायझर्स हैदराबाद संघात होता. त्यावेळी संपुर्ण लीगमध्ये त्याने संघासाठी अनेक महत्वाच्या खेळी केल्या होत्या.
“युवराज सिंहला 2019 या वर्षी आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्स संघाने सुमारे 1 कोटींची बोली लावून आपल्या ताफ्यात घेतले होते. त्यावेळी संपुर्ण लीगमध्ये युवराजने मुंबईकडून 4 सामने खेळले होते. त्यात त्याने 98 धावा केल्या होत्या. मात्र, त्यानंतर उर्वरित सामन्यात संघाकडून त्याला खेळण्याची संधी मिळाली नाही.”
मुंबईचा संघ मात्र 2019 साली अंतिम सामन्यात चेन्नईला धुळ चारत चौथ्यांदा आयपीएलचा विजेता बनला होता. त्यावेळी संघात असूनही अंतिम सामना युवराज खेळला नव्हता. त्यामुळे अंतिम सामना न खेळता विजेतेपद त्याच्याही खात्यात जमा झाले होते.
क्रमांक – 1
- सचिन तेंडुलकर (2013)
मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर, हा आपल्या संपुर्ण आयपीएल कारकिर्दित फक्त मुंबई इंडियन्स संघाकडून खेळला आहे. सचिन 2008 पासून ते 2013 पर्यंत प्रत्येक वर्षी मुंबई इंडियन्स संघाचा प्रमुख खेळाडू होता.
“सचिन संघात असताना त्याच्याच नेतृत्वाखाली मुंबई इंडियन्सने 2010 मध्ये अंतिम सामन्यापर्यंत धडक दिली होती. मात्र, चेन्नई सुपर किंग्सकडून मुंबईच्या संघाला पराभूत व्हावे लागले होते.”
2013 साली रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली मुंबई इंडियन्सचा संघ पुन्हा एकदा अंतिम सामन्यापर्यंत पोहचला. त्यावेळी मात्र मुंबई इंडियन्सने चेन्नईच्या संघाला पराभूत करत आयपीएलच्या पहिल्यावहिल्या विजेतेपदावर आपले नाव कोरले होते. त्यावर्षी मुंबईच्या संघात कर्णधार म्हणून नाही, पंरतु प्रमुख खेळाडू म्हणून सचिनचा सहभाग होता.
2013 साली आयपीएलच्या संपूर्ण हंगामात सचिन तेंडुलकरने मुंबई संघाकडून एकूण 14 सामने खेळले होते. त्यात त्याने 124.24 च्या सरासरीने एकूण 287 धावा केल्या होत्या. मात्र, जखमी असल्याने अंतिम सामन्यात सचिन खेळू शकला नव्हता. सचिनच्या मैदानावरील उनुपस्थितीत मुंबई इंडियन्सने विजेतेपद पटकावल्याने आयपीएलचा अंतिम सामना न खेळताही विजेतेपद पटकावणारा खेळाडू म्हणून सचिनची गणना केली जाते.