भारतीय क्रिकेटपटू रिषभ पंत याने फलंदाजीबरोबर आपल्या यष्टीरक्षणानेही सध्या खूप वाहवाही लुटली आहे. याखेरीज सामन्यादरम्यानच्या यष्टीमागील आपल्या समालोचनानेही तो चाहत्यांचे लक्ष वेधत असतो. रिषभ सध्या इंग्लंड दौऱ्यावर असल्याने श्रीलंका दौऱ्यावर युवा इशान किशन भारतीय संघाकडून यष्टीरक्षण करताना दिसत आहे. मंगळवारी (२० जुलै) कोलंबो येथे झालेल्या दुसऱ्या वनडे सामन्यात त्याला फलंदाजीत विशेष कामगिरी करता आली नाही. परंतु त्याने यष्टीमागे उल्लेखनीय कामगिरी केली आहे. दरम्यान इशानही अगदी पंतप्रमाणे कृती करत सर्वांच्या आकर्षणाचा विषय ठरला आहे.
इशानने नक्की काय केले?
तर झाले असे की, श्रीलंकेचा डाव ५० वे षटक खेळत होता. यावेळी तळातील खेळाडू कसून रजिता आणि लक्षण संदकन मैदानावर फलंदाजी करत होते. शेवटचे षटक टाकत असलेल्या भुवनेश्नर कुमारच्या तिसऱ्या चेंडूवर संकदनने मोठा शॉट खेळण्याचा प्रयत्न केला. परंतु चेंडू त्याच्या बॅटला लागून सरळ मागे यष्टीरक्षक इशान किशनच्या हातात गेला. पण संकदनला वाटले चेंडू हवेत दूरवर गेला आहे. त्यामुळे तो पटकन एक धाव घेण्यासाठी पळाला. तेवढ्यात इशानने पुढे येत चेंडू यष्टीला मारला आणि संकदन धावबाद झाला.
यानंतर इशान आपल्यापुढे असलेल्या भुवनेश्वरला सांगतो की, ‘मी याला (संकदन) आधीच सांगितले होते की, मी तुला धावबाद करणार आहे.’ त्याचे हे बोल स्टंप माईकमध्ये कैद झाल्याने ते अगदी समालोचकांच्याही कानी पडतात. हे ऐकून समालोचक त्याची प्रशंसा करू लागतात. यावेळी त्यांना इशानचा पहिल्या वनडेतील पहिल्या चेंडूवरील पुर्वनियोजित षटकार आठवतो.
इशानच्या या कृतीने सर्वांना रिषभची आठवून करुन दिली आहे. लाईव्ह सामन्यात केवळ पंत किंवा इशानच नव्हे तर माजी यष्टीरक्षक एमएस धोनीसुद्धा बऱ्याचदा यष्टीमागून मजेशीर वाक्ये बोलताना दिसला आहे. चाहत्यांना या यष्टीरक्षकांचा लाईव्ह सामन्यातील हा मस्तीखोर अंदाज नेहमीच आवडतो.
https://twitter.com/pant_fc/status/1417515577455775744?s=20
पहिल्या वनडेत ठरवून इशानने मारला होता षटकार
इशानने पहिल्या वनडे सामन्यात आपल्या कामगिरीचा ठसा उमटवला होता. त्याने या सामन्यातून वनडे पदार्पण केले होते. या पदार्पणातील सामन्यात पहिल्याच चेंडूवर त्याने नेत्रदिपक षटकार मारला होता. विशेष बाब अशी की, तो मैदानावर उतरण्यापुर्वी संघ सहकाऱ्यांना सांगून आला होता की, गोलंदाज कोणीही असो, चेंडू कसाही येवो. पण तो पहिल्याच चेंडूवर षटकार मारुन दाखवेल आणि त्याने आपले बोल खरे ठरवले होते. तसेच पुढे आपली फटकेबाजी सुरू ठेवत अर्धशतक झळकावले होते. ४२ चेंडूंमध्ये २ षटकार आणि ८ चौकारांच्य मदतीने ५९ धावा केल्या होत्या.
भारताचा दुसऱ्या वनडेत ३ विकेट्सने विजय
दरम्यान दुसऱ्या वनडेत भारताने श्रीलंकेला ३ विकेट्सने पराभवाची धूळ चारली. प्रथम फलंदाजी करताना श्रीलंकाने भारताला २७६ धावांचे लक्ष्य दिले होते. श्रीलंकेकडून सलामीवीर अविष्का फर्नांडो (५० धावा) आणि चरिथ असलांका (६५ धावा) यांनी अर्धशतकी खेळी केल्या होत्या. तसेच चामिका करुणारत्ने यानेही नाबाद ४४ धावांचे योगदान दिले होते. भारताकडून भुवनेश्वर कुमारने सर्वाधिक ३ विकेट्स आणि दिपक चाहरने २ विकेट्स घेतल्या होत्या.
श्रीलंकेच्या २७६ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना भारताकडून दिपक चाहरने सर्वाधिक नाबाद ६९ धावा चोपल्या होत्या. तसेच सूर्यकुमार यादव यानेही ५३ धावा जोडल्या होत्या. भारताने ४९.१ षटकात ३ गडी राखून हा सामना जिंकला आणि वनडे मालिकेत २-० अशी विजयी आघाडी घेतली.
महत्त्वाच्या बातम्या-
विजयाच्या जवळ पोहोचूनही श्रीलंकेच्या पदरी निराशा, पण कर्णधाराने ‘असे’ भाष्य करत जिंकली लाखो मने
चाहरचा मॅच विनिंग चौकार अन् सूर्याने आहे त्या अवस्थेत धावत येत मारली मिठी, पाहा तो अप्रतिम क्षण
‘टीम धवन’च्या विजयाचा आनंद द्विगुणित, सॅमसन दुखापतीतून सावरला; पण तिसरा वनडे खेळणार का?