---Advertisement---

शार्दुल विरुद्ध खेळताना आर्चरची तुटली बॅट अन् ‘ते’ ट्विट झालं व्हायरल

On: शुक्रवार, मार्च 19, 2021 7:00 AM
---Advertisement---

अहमदाबाद। भारत विरुद्ध इंग्लंड संघात गुरुवारी (१८ मार्च) पार पडलेला चौथा टी२० सामना रोमांचक झाला. भारताने अखेरच्या षटकापर्यंत रंगलेल्या या सामन्यात ८ धावांनी विजय मिळवला. तसेच नरेंद्र मोदी स्टेडियमवर होत असलेल्या या ५ टी२० सामन्यांच्या मालिकेत २-२ अशी बरोबरी केली आहे. दरम्यान या सामन्याच्या शेवटच्या षटकात जोफ्रा आर्चरची बॅट तुटली. त्यामुळे त्याचे एक ट्विट व्हायरल होत आहे.

आर्चरची तुटली बॅट 

भारताने या सामन्यात इंग्लंडला १८६ धावांचे आव्हान दिले होते. या आव्हानाचा पाठलाग करताना इंग्लंडला २० षटकात ८ बाद १७७ धावाच करता आल्या. त्यामुळे इंग्लंडला पराभव स्विकारावा लागला. तरी इंग्लंडने शेवटच्या षटकापर्यंत झुंज दिली होती.

शेवटच्या षटकात इंग्लंडला २३ धावांची गरज होती. यावेळी भारताकडून शार्दुल ठाकूर गोलंदाजी करत होता. तर इंग्लंडकडून जोफ्रा आर्चर आणि ख्रिस जॉर्डन फलंदाजी करत होते.

या षटकात पहिल्या तीन चेंडूत जोफ्रा आर्चरने १० धावा काढल्या. त्यानंतर २ चेंडू वाईड गेल्याने सामना रंगतदार अवस्थेत आला. त्यानंतर शार्दुलने टाकलेल्या वेगवान चेंडूवरही आर्चरने मोठा फटका मारण्याचा प्रयत्न केला. मात्र चेंडू त्याच्या बॅटच्या खालच्या बाजूच्या कोपराला लागला आणि त्याच्या बॅटचा कोपरा तुटून उडाला. यावेळी आर्चरला केवळ १ धावच करता आली. या घटनेचा व्हिडिओ व्हायरल होत आहे.

यानंतर आर्चरने नवी बॅट मागवली. अखेरच्या २ चेंडूवर ९ धावांची गरज असताना ख्रिस जॉर्डन बाद झाला आणि शेवटच्या चेंडूवर आर्चरला धाव घेता आली नाही. अखेर भारताने या सामन्यात विजयावर शिक्कामार्तब केले.

https://twitter.com/PrithviMatka/status/1372605080642363394

https://twitter.com/DivzArjun/status/1372604686591684608

आर्चरचे ट्विट होतंय व्हायरल

आर्चरची बॅट चौथ्या टी२० सामन्यादरम्यान तुटल्याची घटना घडल्यानंतर त्याचे ७ मार्च २०१८ रोजी केलेलं एक ट्विट व्हायरल होत आहे. या ट्विटमध्ये लिहिले आहे की ‘युकेमध्ये बॅट चांगले दुरुस्त करणारे कोणी लोक आहेत का?’

खरंतर आर्चरचे जूने ट्विट्स अनेकदा व्हायरल होत असतात. क्रिकेट सामन्यामध्ये एखादी अनोखी गोष्ट घडल्यानंतर बऱ्याचदा त्याचे जूने ट्विट व्हायरल होतात. त्यामुळे अनेक चाहते त्याला गमतीने भविष्यवेत्ताही म्हणतात.

भारताने उभा केला १८५ धावांचा डोंगर 

या सामन्यात इंग्लंडने नाणेफेक जिंकून भारताला प्रथम फलंदाजीसाठी पाचारण केले होते. मात्र भारताचे वरच्या फळीतील फलंदाज लवकर बाद झाले. पण त्यानंतर सुर्यकुमार यादवने (५७) अर्धशतक पूर्ण केले. तसेच श्रेयस अय्यरने(३७) आक्रमक खेळ केला. त्यामुळे भारताला २० षटकात ८ बाद १८५ धावा करता आल्या. इंग्लंडकडून जोफ्रा आर्चरने सर्वाधिक ४ विकेट्स घेतल्या.

इंग्लंडकडून बेन स्टोक्सची आक्रमक खेळी

भारताने दिलेल्या १८६ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना इंग्लंडकडून जेसन रॉयने ४० धावांची खेळी केली. पण तो बाद झाल्यानंतर बेन स्टोक्सने इंग्लंडच्या फलंदाजीची जबाबदारी स्वत:च्या खांद्यावर घेत आक्रमक खेळ करण्यास सुरुवात केली. त्याने २३ चेंडूत ४ चौकार आणि ३ षटकारांसह ४६ धावांची खेळी केली. अखेर त्याचा झंझावात शार्दुल ठाकूरने १७ व्या षटकात संपवला. शार्दुलने स्टोक्सला आणि मॉर्गनला एकापाठोपाठ बाद करत भारताला सामन्यात पुनरागमन करुन दिले.

बेन स्टोक्स आणि मॉर्गन बाद झाल्यानंतर इंग्लंडच्या खालच्या फळीतील फलंदाजांना मोठी कमाल करता आली नाही. केवळ आर्चरने ८ चेंडूत नाबाद १८ धावांसह शेवटच्या षटकापर्यंत झुंज दिली. मात्र त्याला इंग्लंडला विजयापर्यंत पोहचवता आले नाही.

महत्त्वाच्या बातम्या –

पहिल्याच चेंडूवर सुर्यकुमारचा ऐतिहासिक षटकार; ‘असा’ कारनामा करणारा ठरला पहिलाच भारतीय

सुर्यकुमारने केवळ अर्धशतकच केले नाही, तर बेन स्टोक्सचा अफलातून झेलही घेत केली कमाल, पाहा व्हिडिओ

…म्हणून विराट करतोय केएल राहुलचे समर्थन? आकडे पाहून तुम्ही व्हाल थक्क

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---