इंडियन प्रीमियर लीग २०२१ स्पर्धा झाल्यानंतर, यूएई आणि ओमानमध्ये टी२० विश्वचषक स्पर्धेचा थरार पाहायला मिळणार आहे. ही स्पर्धा १७ ऑक्टोबर पासून सुरू होणार आहे. या स्पर्धेत भारतीय संघाचा पहिला सामना पाकिस्तान संघासोबत रंगेल. या सामन्यापूर्वी ऑस्ट्रेलियाच्या दिग्गज खेळाडूने एका भारतीय खेळाडूचे नाव सुचवले आहे,जो आगामी टी२० विश्वचषक स्पर्धेत सर्वाधिक धावा करू शकतो.
भारत विजयाचा प्रबळ दावेदार
ऑस्ट्रेलिया संघाचा दिग्गज गोलंदाज ब्रेट लीने फॉक्स स्पोर्ट्ससोबत बोलताना म्हटले की, “इंग्लंड संघाकडे भरपूर अनुभव आहे. ज्यामुळे ते नेहमी विरोधी संघासाठी धोकादायक ठरत असतात. परंतु, माझ्यामते भारतीय संघ जेतेपद मिळवण्यासाठी प्रबळ दावेदार आहे. इंडियन प्रीमियर लीग स्पर्धेमुळे भारतीय संघाकडे अनेक युवा खेळाडू आहेत. यामध्ये वेगवान गोलंदाजांचा ही समावेश आहे. तसेच, भारतीय संघाच्या मुख्य फळीतील फलंदाजदेखील अप्रतिम आहेत. भारतीय संघ यावेळी प्रबळ आहे. हा संघ विश्वचषक जिंकू शकतो.”
हा भारतीय ठोकनार सर्वाधिक धावा
तर सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजाबाबत बोलताना ब्रेट ली म्हणाला की, “मला वाटते की, केएल राहुल या स्पर्धेत सर्वाधिक धावा करेल. आयपीएल स्पर्धेत त्याने अप्रतिम कामगिरी केली आहे. केएल राहुलने चांगली फलंदाजी केली तर विराट कोहलीवरील दबाव कमी होऊ शकतो. यामुळे विराट कोहलीला आपला स्वाभाविक खेळ खेळण्यात मदत होईल. ही कर्णधार म्हणून त्याची शेवटची स्पर्धा असेल. त्यामुळे तो चांगली कामगिरी करण्याच्या प्रयत्नात असणार आहे.” केएल राहुलने आयपीएल २०२१ स्पर्धेतील १३ सामन्यात एकूण ६२६ धावा केल्या आहेत.
तसेच सूर्यकुमार यादवबाबत बोलताना ब्रेट ली म्हणाला की, “मला वाटते की, सूर्यकुमार यादव पुढील स्टार फलंदाज ठरू शकतो.” तसेच तो पुढे म्हणाला की, “ऑस्ट्रेलियाने आपला सर्वोत्कृष्ट संघ निवडला आहे, जो भारतीय संघाला आव्हान देऊ शकतो. मला वाटते की, हा आमचा सर्वोत्कृष्ट संघ आहे. मी देखील एक देशभक्त आहे. मला असेही वाटते की, ऑस्ट्रेलियाने ही स्पर्धा जिंकावी आणि असे होऊ शकते. परंतु भारतीय संघ नक्कीच अंतिम फेरीत असेल.” भारतीय संघाचा सराव सामना ऑस्ट्रेलिया संघाविरुद्ध २० ऑक्टोबर रोजी दुबईमध्ये पार पडणार आहे.