देशांतर्गत क्रिकेटमधील सर्वात मोठी वनडे स्पर्धा असलेली विजय हजारे ट्रॉफी 2022-2023 सध्या देशभरात विविध शहरात खेळला जात आहे. गुरुवारी (17 नोव्हेंबर) या स्पर्धेत महाराष्ट्र आणि मुंबईचे संघ आमने-सामने आले. या दोन तुल्यबळ संघातील सामन्यात चांगलीच झुंज पाहायला मिळाली. मात्र, फिरकीपटू सत्यजित बच्छाव याने घेतलेल्या सहा बळींमुळे महाराष्ट्राने 21 धावांनी विजय साजरा केला.
रांची येथे खेळल्या गेलेल्या या सामन्यात महाराष्ट्र संघ आपला नियमित कर्णधार ऋतुराज गायकवाड याच्या अनुपस्थितीत मैदानात उतरला. मात्र, संघाचा अनुभवी फलंदाज राहुल त्रिपाठी याने जबाबदारी आपल्या खांद्यावर घेत शानदार खेळ दाखवला. ऋतुराजच्या जागी संधी मिळालेल्या युवा पवन शहा याच्यासह त्याने तब्बल 180 धावांची दणदणीत सलामी दिली. शहाने 84 भावांचे योगदान दिले. दुसरीकडे त्रिपाठीने 109 चेंडूंवर आपले शतक पूर्ण केले. त्याने अखेरपर्यंत नाबाद राहताना 137 चेंडूंवर 18 चौकार व 2 षटकारांच्या मदतीने 156 धावांची खेळी केली. तर अझीम काझीने नाबाद वेगवान अर्धशतक पूर्ण केले. या सर्व फलंदाजांच्या योगदानाच्या जोरावर महाराष्ट्राने मुंबईसमोर विजयासाठी 343 धावांचे मोठे लक्ष ठेवले.
या धावांचा पाठलाग करण्यासाठी उतरलेल्या मुंबईला यशस्वी जयस्वाल व पृथ्वी शॉ यांनी 64 धावांची सलामी दिली. शॉ 32 धावा बाद करून झाल्यावर जयस्वालने एकहाती मुंबईचा डाव सांभाळला. अरमान जाफर, अजिंक्य रहाणे व सर्फराज खान यांना चांगली सुरुवात मिळाली मात्र ते मोठी खेळी करू शकले नाहीत. एकवेळ मुंबईची अवस्था चार बाद 261 अशी होती. मात्र, अनुभवी फिरकीपटू सत्यजित बच्छावने जादुई गोलंदाजी करत मुंबईच्या फलंदाजांना नाकीनऊ आणले. यादरम्यानच यशस्वी जयस्वाल 135 चेंडूंवर 142 धावांची खेळी करून बाद झाला. बच्छावने 6 बळी मिळवत मुंबईच्या डावाची वाताहात केली. अखेरीस मुंबईचा संघ 321 धावांवर सर्वबाद झाला. यासह महाराष्ट्राने 21 धावांनी विजय आपल्या नावे केला.
(Maharashtra Beat Mumbai In Vijay Hazare Trophy)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
‘या’ खेळाडूला डावलणे सीएसकेला महागात पडणार! विजय हजारे ट्रॉफीत कुटले सलग तिसरे शतक
उत्तराखंडमधील नीब करोरी बाबाच्या दर्शनाला पोहोचला विराट, चाहत्यांसोबतचे फोटो व्हायरल