भारतीय महिला क्रिकेट संघ पुढील महिन्यात इंग्लंड दौऱ्यावर जाणार आहे. भारतीय पुरुष संघासोबत महिला संघ २ जून रोजी इंग्लंडला रवाना होईल. तत्पूर्वी, दोन्ही संघ मुंबई येथे विलगीकरणात आहेत. या दौऱ्यावर भारतीय संघाचे कसोटी व वनडे क्रिकेटमध्ये अनुभवी फलंदाज मिताली राज ही नेतृत्व करणार आहे. मितालीने सोशल मीडियावर केलेल्या बातचीतमध्ये नुकतेच संघाचे नवनियुक्त प्रशिक्षक रमेश पोवार यांच्याविषयी मते मांडली.
“सर्व विसरून पुढे जावे लागेल”
काही दिवसांपूर्वी भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) डब्ल्यू वी रमन यांच्या जागी रमेश पोवार यांची नियुक्ती केली. पोवार यापूर्वीदेखील भारतीय महिला संघाचे प्रशिक्षक होते. त्यावेळी, तत्कालीन कर्णधार मिताली राज व पोवार यांच्यादरम्यान वाद झालेला. मितालीने सोशल मीडियावरून साधलेल्या संवादात पोवार यांच्याविषयी आपली मते मांडली. ती म्हटली, “आम्हाला सर्व काही विसरून पुढे जावे लागेल. मला आशा आहे की ते पुन्हा चांगल्या योजना घेऊन आले असतील. ज्यावेळी आपण देशाचे प्रतिनिधित्व करत असतो त्यावेळी वैयक्तिक आवडनिवड व वाद बाजूला ठेवावे लागतात. पुढील वर्षी विश्वचषकाच्या अनुषंगाने मजबूत संघ तयार करण्यावर आमचा भर राहील.”
मितालीने या मुलाखतीत इंग्लंड दौरा व भविष्यातील आव्हानांविषयी देखील आपले म्हणणे मांडले. “इंग्लंड दौऱ्यावर आम्ही तिन्ही प्रकारचे सामने खेळणार आहोत ही चांगली गोष्ट आहे. येथे होणारी एकमेव कसोटी ही गुलाबी चेंडूने होईल व तो आमच्यासाठी एक चांगला अनुभव असेल. मीदेखील अखेरची कसोटी सात वर्षापूर्वी खेळलेले. महिलांचे जास्तीत जास्त कसोटी सामने आयोजित व्हावेत अशी माझी इच्छा आहे.” इंग्लंड दौऱ्यावर मिताली वनडे व कसोटी संघाचे नेतृत्व करेल तर, हरमनप्रीत कौर टी२० संघाची धुरा वाहिल.
असा झाला होता मिताली-पोवार वाद
भारताचे आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू राहिलेल्या रमेश पोवार यांनी जुलै २०१८ मध्ये प्रथम महिला संघाचे मुख्य प्रशिक्षकपद भूषवले होते. मात्र, कर्णधार मिताली राजसोबत सातत्याने वाद होत असल्याने त्यांना नोव्हेंबर २०१८ मध्ये पायउतार व्हावे लागलेले. यावर्षी मुंबई संघाने पोवार यांच्याच मार्गदर्शनाखाली विजय हजारे चषक आपल्या नावे केला. त्यानंतर, बीसीसीआयने त्यांच्यावर पुन्हा महिला संघाची जबाबदारी दिली आहे.
महत्वाच्या बातम्या-
WTC फायनलमध्ये एका सामन्याऐवजी तीन सामने पाहिजे होते; विश्वविजेत्या भारतीय कर्णधाराचे परखड मत
या ३ कारणांमुळे अर्जुन तेंडुलकरला मिळाले नाही मुंबई इंडियन्सच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये स्थान