नवी दिल्ली । २००२मध्ये इंग्लंड दौऱ्यात भारतीय संघाच्या अविस्मरणीय विजयाचा हिरो मोहम्मद कैफ लॉकडाऊनमध्ये सोशल मीडियावर सक्रिय झाला आहे. त्याने गुरुवारी (२१ मे) हॅलो ऍपमार्फत लाईव्ह चॅट केले. यामध्ये त्याने भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीबद्दलच्या गोष्टींबद्दल आपले मत स्पष्ट केले आहे. तसेच त्याने भारतीय संघ मागील ७ वर्षांपासून आयसीसीच्या मोठ्या स्पर्धा जिंकण्यामध्ये अयशस्वी होण्यामागील विराटची चूकदेखील सांगितली आहे.
याबद्दल कैफने (Mohammad Kaif) हॅलो ऍपच्या लाईव्ह सेशनमध्ये बोलताना म्हटले की, “विराटच्या भारतीय संघातील अकरा खेळाडूंमध्ये सतत बदल करण्याच्या सवयीमुळे भारतीय संघाला आयसीसीच्या मोठ्या स्पर्धांमधील महत्त्वाच्या सामन्यांमध्ये पराभवाचा सामना करावा लागतो.”
“एक खेळाडू म्हणून विराट (Virat Kohli) महान खेळाडू आहे, यामध्ये शंका नाही. परंतु जर तुम्हाला विश्वचषकासारख्या स्पर्धा जिंकायच्या असतील, तर तुम्हाला संघबांधणीवर लक्ष द्यावे लागेल. कारण तुम्ही एकटे संघाला विजय मिळवून देऊ शकत नाही,” असे विराटबद्दल बोलताना म्हणाला.
“एकट्या विराटबद्दल बोलायचं झालं तर, तो दिग्गज खेळाडू आहे. परंतु स्पर्धांमध्ये जिंकण्यासाठी संपूर्ण संघाच्या योगदानाची आवश्यकता असते. विराट संघनिवडीसाठी अनेक प्रयोग करत आहे. त्याने असे केले नाही पाहिजे. त्याने बऱ्याच योजनांचा प्रयत्न केला आणि निवडलेल्या खेळाडूंना मागील विश्वचषकात चांगली कामगिरी करता आली नाही. विराटला आपल्या संघबांधणीवर लक्ष केंद्रित केले पाहिजे आणि त्यांना पाठिंबा दिला पाहिजे,” असेही विराटच्या संघबांधणीबद्दल बोलताना कैफ म्हणाला.
खेळाडूंबद्दल बोलताना तो म्हणाला की, “जर कोणत्याही खेळाडूने काही सामन्यांसाठी आपला फॉर्म गमावला, तरीही त्याला पाठिंबा दिला पाहिजे. विराटने खेळाडूंना तयार करण्याची आवश्यक आहे. तेव्हाच तो एक चांगला संघ तयार करू शकतो. मला आशा आहे की, यावर तो नक्की काम करेल.”
ट्रेंडिंग घडामोडी-
-कसोटीत क्रिकेटमध्ये वेगवान अर्धशतक करणारे ४ फलंदाज
-पाकिस्तान संघाला वनडेत धु- धु धुणारे ३ भारतीय क्रिकेटर्स
-एक नाही, दोन नाही; तब्बल ५१ वर्ष आहे अबाधित या भारतीयाचा कसोटी विक्रम