भारत आणि ऑस्ट्रेलिया संघादरम्यान मेलबर्न क्रिकेट ग्राउंड येथे झालेला दुसरा कसोटी सामना भारताने 8 गडी राखून जिंकला आहे. नियमित कर्णधार विराट कोहलीच्या अनुपस्थित खेळणाऱ्या भारतीय संघाने अजिंक्य रहाणेच्या नेतृत्वात एक नवा इतिहास घडवला आहे. मालिकेत पिछाडीवर असून देखील भारतीय संघा ज्या आत्मविश्वासाने मैदानात खेळला, तो बघून सर्वांनाच आनंद झाला आहे. कर्णधार अजिंक्य रहाणेने आपल्या नेतृत्वाने व फलंदाजीने सर्व क्रिकेट रसिकांची मने जिंकली आहेत. याचदरम्यान त्याने सामन्याच्या चौथ्या दिवशी युवा वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराजला दिलेल्या सन्मानाने संपूर्ण क्रिकेटविश्वात अजिंक्यबद्दलचा आदर आणखीनच वाढला आहे .
ऑस्ट्रेलियाचा दुसरा डाव 200 धावांवर आटोपल्यानंतर अजिंक्यने मैदानातून बाहेर जाताना सिराजला संघाचे नेतृत्व करण्यास सांगितले. आपल्या पदार्पणातच सिराजला इतका मोठा सन्मान मिळाल्याने सर्व क्रिकेटरसिकांना आनंद झाला व त्याचबरोबरच अजिंक्यच्या कौतुकास्पद निर्णयाची सर्वांनी प्रशंसा केली.
सिराजला आपल्या उत्तम गोलंदाजीचेच फळ मिळाले होते, असे म्हटले तरी वावगे ठरणार नाही. सिराजने संपूर्ण सामन्यात उत्तम गोलंदाजी केली. त्याने पहिल्या डावात 2 ऑस्ट्रेलियन फलंदाजांना बाद केले, तर दुसऱ्या डावात आपल्या उत्कृष्ट गोलंदाजीने 3 प्रमुख खेळाडूंना तंबूचा मार्ग दाखवला.
शमीच्या दुखापतीनंतर भारतीय संघासमोर दुसऱ्या कसोटी सामन्यापूर्वी वेगवान गोलंदाजीचा प्रश्न निर्माण झाला होता. कर्णधार अजिंक्य व संघव्यवस्थापनाने सिराजवर विश्वास दाखवला व त्याने देखील या विश्वासाला साजेशी कामगिरी केली. मालिकेतील उर्वरित सर्व सामन्यांत सिराजकडून अशाप्रकारच्याच उत्तम कामगिरीची अपेक्षा असणार आहे. भारत आणि ऑस्ट्रेलिया दरम्यानचा तिसरा कसोटी सामना 7 जानेवारीपासून सुरू होणार आहे.