नवी दिल्ली । कोरोना व्हायरसमुळे संपूर्ण जगभरात भीतीचे वातावरण पसरले आहे. लोकांना घरातून बाहेर पडणे कठीण झाले आहे. परंतु यामुळे लावण्यात आलेल्या लॉकडाऊनदरम्यान देशात प्रवासी कामगारांचे स्थलांतर सुरु आहे. अशा कठीण परिस्थितीत भारतीय संघाचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीने घरी परतणाऱ्या कामगारांची मदत करण्याची जबाबदारी घेतली आहे.
या सर्व कामगारांना सध्या सर्वात अधिक दोन वेळच्या जेवणाची आवश्यकता आहे. कारण त्यांच्या उत्पन्नाचे सर्व मार्ग बंद झाले आहेत.
लॉकडाऊनमुळे (Lockdown) आपल्या जिल्हा अमरोहामध्ये शमीने (Mohammed Shami) स्वत: जिल्हा प्रशासनाच्या मदतीने दिल्ली-लखनऊ महामार्गावर बिहार आणि पूर्व उत्तर प्रदेशच्या दिशेने जाणाऱ्या कामगारांना जेवण आणि पाण्याचे वाटप केले. तो म्हणाला की, दररोज तो जवळपास ८-१० हजार लोकांच्या खाण्या-पिण्याची व्यवस्था करत आहे. शमीचा असा प्रयत्न आहे की, दररोज लोकांच्या जेवणाची सोय केली पाहिजे. जेणेकरून अडचणीमध्ये असलेल्या लोकांची समस्या कमी करता येईल.