कोलंबो | काल भारतीय संघाला श्रीलंका संघाविरूद्ध निराशाजनक पराभवाला सामोरे जावे लागले. या दौऱ्यात भारतीय संघाची धुरा सांभाळत असलेल्या रोहीत शर्माला भोपळाही फोडता आला नाही.
तो ४ चेंडूत ० धावा करुन तंबूत परतला. यामूळे त्याला सोशल माध्यमांवर जोरदार ट्रोल करण्यात आले.
गेल्या ५ वर्षांत रोहीत शर्मा सर्व प्रकारच्या क्रिकेटमध्ये मिळून तब्बल १२ वेळा ० धावेवर बाद झाला आहे. हा भारताकडून झालेला नकोसा असा विक्रम आहे. तर आंतरराष्ट्रीय टी२० सामन्यात तो ५व्यांदा ० धावेवर बाद झाला आहे.
भारताकडून सर्व प्रकारच्या क्रिकेटमध्ये या काळात इशांत शर्माही १२ वेळा, भुवनेश्वर कुमार ११ वेळा तर विराट कोहली १० वेळा ० धावेवर बाद झाले आहेत.