भारतात सध्या इंडियन प्रीमियर लीग अर्थात आयपीएल २०२१ स्पर्धेचा थरार रंगतो आहे. या स्पर्धेला ९ एप्रिल पासून सुरुवात झाली आहे. तर ३० मे रोजी या स्पर्धेचा अंतिम सामना खेळवला जाणार आहे. न्यूझीलंड संघाचे खेळाडू देखील या स्पर्धेचा भाग आहे. ही स्पर्धा संपल्यानंतर क्रिकेट चाहत्यांना विश्व कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम सामन्याचा थरार पाहायला मिळणार आहे. याच पार्श्वभूमीवर न्यूझीलंड क्रिकेट बोर्डने मोठा निर्णय घेतला आहे.
येत्या जून महिन्यात इंग्लंडमध्ये ,भारत आणि न्यूझीलंड यांच्यात विश्व कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम फेरीचा थरार रंगणार आहे. हा मोठा सामना दीड महिन्यानंतर होणार आहे. न्यूझीलंड क्रिकेट बोर्डने जाहीर केले आहे की, न्यूझीलंड संघातील खेळाडू, भारतीय संघासोबत इंग्लंडला रवाना होतील.
न्यूझीलंड क्रिकेट बोर्डाने केले विधान
न्यूझीलंड क्रिकेट असोसिएशनचे मुख्य कार्यकारी अधिकारी हिथ मिल्स यांनी म्हटले की, “आयपीएल स्पर्धा खेळत असलेले न्यूझीलंड संघातील खेळाडू,जून मध्ये होणाऱ्या विश्व कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम सामन्यासाठी भारतीय संघासोबत प्रवास करू शकतात. कारण ते मायदेशी परतू शकत नाही.” भारतात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता आयपीएल खेळत असलेल्या न्यूझीलंड संघातील खेळाडूंना मायदेशी परतण्याची अनुमती दिली गेली नाहीये.
न्यूझीलंड संघातील खेळाडू आयपीएल खेळण्यात व्यस्त
न्यूझीलंड संघातील प्रमुख खेळाडू सध्या आयपीएल स्पर्धा खेळण्यात व्यस्त आहेत. कर्णधार केन विलीयमसन, ट्रेंट बोल्ट, काइल जेमिसन आणि मिशेल सेंटनरसह १० खेळाडू आयपीएलच्या वेगवेगळ्या संघाचे प्रतिनिधित्व करत आहेत. खेळाडूंसह माजी क्रिकेटपटू देखील आयपीएल स्पर्धेत मोलाची भूमिका बजावत आहेत. स्टीफन फ्लेमिंग (सीएसके मुख्य प्रशिक्षक), ब्रेंडन मॅक्यूलम (केकेआर मुख्य प्रशिक्षक), माइक हेसन (आरसीबी क्रिकेट डायरेक्टर), शेन बॉन्ड (मुंबई इंडियन्स गोलंदाजी प्रशिक्षक), जेम्स पेमेंट (मुंबई इंडियन्स क्षेत्ररक्षण प्रशिक्षक ), काइल मिल्स (केकेआर गोलंदाजी प्रशिक्षक ), क्रिस डोनाल्डसन (केकेआर स्ट्रेंथ एंड कंडीशनिंग), हे आयपीएलमध्ये विविध भूमिका बजावत आहेत.
कधी होणार आहे विश्व कसोटी अजिंक्यपद स्पर्धेचा अंतिम सामना
इंडियन प्रीमियर लीग स्पर्धेचा अंतिम सामना झाल्यानंतर, येत्या १८ जून ते २२ जून दरम्यान, न्यूझीलंड विरुद्ध भारत यांच्यात हा अंतिम सामना खेळवण्यात येणार आहे. हा सामना साउथहैप्टन मध्ये खेळवण्यात येणार आहे. भारतीय संघाने इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया या बलाढ्य संघांना पराभूत करत या स्पर्धेची अंतिम फेरी गाठली आहे.
महत्वाच्या बातम्या:
आनंदाची बातमी! धोनीच्या आई-वडिलांची कोरोनाच्या विळख्यातून सुटका, हॉस्पिटलमधून मिळाला डिस्चार्ज
एकाच कसोटी सामन्यात कुटल्या गेल्या तब्बल १३०० धावा, आयसीसीने खेळपट्टीला दिले हे रेटिंग
माझ्या या चुकीमुळे आम्ही सामना गमावला, वॉर्नरने पराभवानंतर दिली कबुली