भारतीय संघाचा दिग्गज फिरकी गोलंदाज रविचंद्रन अश्विनने संघात जोरदार पुनरागमन केले आहे. भारत आणि न्यूझीलंड यांच्यात सध्या कसोटी मालिकेतील पहिला सामना खेळला जात आहे. अश्विनने या सामन्यात संघासाठी महत्वाची खेळी केली. त्याने पहिला डावात भारतासाठी तीन महत्वाचे विकेट्स घेतले. दरम्यान, त्याने त्याची एक महत्वाची प्रतिक्रिया दिली. त्याच्या मते त्याला मोठ्या अपेक्षांमध्ये राहण्याची आणि खेळण्याची सवय लागली आहे. तसेच त्याच्यावर आता बाहेरच्या जगातील इतर गोष्टींचा जास्त परिणाम होत नाही.
न्यूझीलंडविरुद्ध खेळल्या जाणाऱ्या कसोटी सामन्याच्या तिसऱ्या दिवशीचा खेळ संपल्यावर अश्विन म्हणाला की, “मी त्या अपेक्षांमध्ये जगत आलो आहे. माझ्यासाठी क्रिकेट माझ्या आयुष्याचे उद्दिष्ट बनले आहे. मी त्या टप्प्यावर आहे, जेथे मी बाहेरच्या आवाजाला पहिल्यापेक्षा चांगल्या प्रकारे रोखू शकत आहे.”
अश्विनने पुढे बोलताना गोलंदाजांच्या प्रदर्शनाचे कौतुक केले. तो म्हणाला की, “हे पाहा, मला वाटते की, गोलंदाजी आक्रमणाच्या रूपात आम्ही एकजूट होऊन प्रदर्शन करत आहोत. अशा प्रकारच्या खेळपट्टीवर १३०-१४० षटके टाकणे आणि प्रत्येक षटकात अडीच धावा खर्च करणे, हे नेहमी मेहनतीचे परिणाम असतात. आम्ही याची तयारी केली आहे. प्रत्येकाने त्यांची भूमिका चांगल्या प्रकारे पार पाडली.”
दरम्यान, अश्विनने पहिल्या कसोटी सामन्यात फलंदाजी आणि गोलंदाजी दोन्हींमध्ये महत्वाचे प्रदर्शन केले. त्याच्या प्रदर्शनाच्या मदतीने भारतीय संघ न्यूझीलंडला मर्यादित धावसंख्येवर रोखू शकला. भारतीय संघाने सामन्याच्या पहिल्या डावात ३४५ धावा केल्या. यामध्ये अश्विनच्या ३८ धावांचे महत्वाचे योगदान होते. प्रत्युत्तरात न्यूझीलंड संघ २९६ धावा करून सर्वबाद झाला. अश्विनने यामध्ये तीन महत्वाच्या विकेट्स घेतल्या. पहिल्या डाव संपल्यानंतर भारत ४९ धावांनी आघाडीवर होता.
सामन्याच्या दुसऱ्या डावातही अश्विनने महत्वाची भूमिका पार पाडली. भारतीय संघाने दुसऱ्या डावात २३४ धावा केल्या आणि डाव घोषित केला. न्यूझीलंसमोर विजयासाठी २८४ धावांचे आव्हान आहे. अश्विनने दुसऱ्या डावात ३२ धावा केल्या. त्याने महत्वाच्या वेळी अय्यरसोबत ५२ धावांची भागीदारी केली. चौथ्या दिवसाचा खेळ संपण्यापूर्वी न्यूझीलंडच्या दुसऱ्या डावाची सुरुवात झाली आणि अश्विनने न्यूझीलंडचा सलामीवीर विल यंगचा विकेट घेतला.