भारताचा अनुभवी फिरकी गोलंदाज पीयूष चावला यानं विश्वचषक 2011 च्या अंतिम सामन्यात विराट कोहलीनं खेळलेल्या खेळीचं कौतुक केलं आहे.
वानखेडे स्टेडियमवर भारत आणि श्रीलंका यांच्यात विश्वचषक 2011 चा अंतिम सामना खेळला गेला होता. विजायासाठी श्रीलंकेनं दिलेल्या 275 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना भारतीय संघानं केवळ 6.1 षटकात सचिन तेंडुलकर आणि वीरेंद्र सेहवागच्या रुपात 2 मोठ्या विकेट गमावल्या. मात्र येथून कोहलीनं गौतम गंभीरच्या मदतीनं भारताचा डाव सावरला. दोन्ही खेळाडूंमध्ये तिसऱ्या विकेटसाठी 83 धावांची अर्धशतकी भागीदारी झाली, ज्यामुळे भारतीय संघ अडचणीतून बाहेर आला.
अंतिम सामन्यात चौथ्या क्रमांकावर फलंदाजी करताना विराट कोहलीनं 49 चेंडूत 71.42 च्या स्ट्राइक रेटनं 35 धावा केल्या. या खेळीत त्याच्या बॅटमधून 4 चौकार निघाले. या खेळीबद्दल बोलताना 35 वर्षीय चावला म्हणाला, “2011 च्या विश्वचषक फायनलमध्ये विराट कोहलीनं खेळलेल्या उत्कृष्ट खेळीबद्दल लोक फारसं बोलत नाहीत. ती खेळी खूप महत्त्वाची होती. आम्ही 2 विकेट गमावल्या होत्या आणि त्यानं फायनलमध्ये अत्यंत महत्त्वाची खेळी खेळली.”
टीम इंडियासाठी अंतिम सामन्यात गौतम गंभीरनं सर्वाधिक धावा केल्या. तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करताना गंभीरनं एकूण 122 चेंडूंचा सामना करत 97 धावांची खेळी खेळली. या दरम्यान त्याचा स्ट्राईक रेट 79.50 एवढा राहिला. अखेरच्या षटकांमध्ये कर्णधार महेंद्रसिंह धोनीनं जोरदार फटकेबाजी करत 79 चेंडूत 91 धावांची नाबाद अर्धशतकी खेळी केली. त्यानं नुवान कुलसेकराच्या गोलंदाजीत षटकार ठोकून भारताला विजय मिळवून दिला. धोनीला त्याच्या या खेळीसाठी ‘प्लेअर ऑफ द मॅच’च्या पुरस्कारानं गौरवण्यात आलं.
हेही वाचा –
“भारतीय संघाची काॅपी करा” माजी खेळाडूचा पाकिस्तानला टोला
भारतीय संघात स्थान मिळवण्यासाठी स्टार फलंदाज करतोय गोलंदाजी! सुनील नारायणच्या स्टाईलची हुबेहूब नक्कल
आयपीएल मेगा लिलावापूर्वी हेनरिक क्लासेनची स्पर्धेतून माघार; संघाला मोठा धक्का!






