भारतीय संघाचा युवा प्रतिभावान यष्टीरक्षक फलंदाज रिषभ पंत याचा शुक्रवारी (दि. 30 डिसेंबर) हरिद्वारमधील मंगलोर येथे रस्ते अपघात झाला. पंत या अपघातात थोडक्यात बचावला, परंतु त्याला गंभीर दुखापत झाली. त्याच्या डोक्याला आणि पायाला मार बसला. सध्या तो डेहराडूनच्या मॅक्स रुग्णालयात उपचार घेत आहे. मर्सिडीज बेंझमध्ये आपल्या आईला भेटण्यासाठी रुडकी येथे जात असताना पंतसोबत ही घटना घडली. 25 वर्षीय पंत आता जास्त काळ क्रिकेटपासून दूर राहील असे म्हटले जात आहे. अशात त्याच्यासाठी चाहत्यांपासून ते दिग्गज क्रिकेटपटू आणि राजकारण्यांपर्यंत अनेकांनी प्रार्थना केली आहे.
रिषभ पंत (Rishabh Pant) याच्या अपघातानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Ninister Narendra Modi) यांनीही ट्वीट केले. त्यांनी पंत लवकर बरा होण्याची प्रार्थना केली आहे. त्यांनी ट्वीटमध्ये लिहिले की, “प्रसिद्ध क्रिकेटपटू रिषभ पंतसोबत झालेल्या घटनेमुळे मी व्यथित आहे. मी त्याच्या आरोग्य आणि कल्याणासाठी प्रार्थना करतो.”
मोदींव्यतिरिक्त भारतीय संघाचा माजी कर्णधार विराट कोहली (Virat Kohli) यानेही पंतविषयी ट्वीट केले. त्याने ट्वीटमध्ये लिहिले की, “रिषभ पंत लवकर बरा हो. तू लवकर बरा व्हावा यासाठी प्रार्थना करतो.”
याव्यतिरिक्त क्रीडाजगतातील अनेक आजी-माजी दिग्गजांनी पंत लवकर बरा व्हावा यासाठी प्रार्थना केली. ‘मास्टर ब्लास्टर’ सचिन तेंडुलकर याने ट्वीट करत लिहिले की, “रिषभ पंत तू लवकर बरा होण्याची प्रार्थना करतो. माझ्या प्रार्थना तुझ्यासोबत आहेत.”
भारतीय संघाचा माजी फलंदाज आणि सध्या राष्ट्रीय क्रिकेट अकादमीचा प्रमुख व्हीव्हीएस लक्ष्मण याने ट्वीट केले की, “रिषभ पंतसाठी प्रार्थना. सुदैवाने तो त्याची तब्येत आता ठीक आहे. तो लवकरात लवकर बरा व्हावा ही सदिच्छा.”
आपल्या विस्फोटक फलंदाजीसाठी ओळखला जाणारा माजी भारतीय फलंदाज वीरेंद्र सेहवाग (Virender Sehwag) यानेही पंतसाठी ट्वीट केले. त्याने ट्वीटमध्ये लिहिले की, “पंत लवकर बरा व्हावा यासाठी प्रार्थना. लवकरात लवकर बरा हो.”
भारतीय क्रिकेट नियामक मंडळ म्हणजेच बीसीसीआयने म्हटले आहे की, त्यांचे वैद्यकीय पथक पंतसोबत संपर्कात आहे. बोर्डाचे सचिव जय शाह यांनी एका निवेदनात म्हटले की, “रिषभ पंतला आरोग्यविषयक सुविधा मिळत आहेत, याची बोर्ड खात्री करेल. जेणेकरून तो या स्थितीतून बाहेर येऊ शकेल.”
रिषभ पंत नुकत्याच पार पडलेल्या बांगलादेशविरुद्धच्या कसोटीत चांगलाच चमकला होता. त्याने यादरम्यान आपल्या फलंदाजीचा दम दाखवून दिला होता. पंतने यादरम्यान खेळलेल्या 2 सामन्यांतील 3 डावात फलंदाजी करताना 148 धावांचे योगदान दिले होते. यादरम्यान त्याने दुसऱ्या कसोटीच्या पहिल्या डावात 93 धावांची सर्वोच्च खेळी साकारली होती. (pm narendra modi and former captain virat kohli reaction on rishabh pant team india star cricketer road accident)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
माणूस व्हा रे! रिषभच्या अपघातानंतर कार्तिकची लोकांना कळकळीची विनंती; म्हणाला…
पंतच्या अपघाताविषयी बीसीसीआयची मोठी अपडेट, बोर्ड कुटुंबियांच्या सतत संपर्कात






