विराट कोहलीच्या नेतृत्वातील भारतीय संघ सध्या इंग्लंड दौऱ्यावर आहे. भारत ४ ऑगस्टपासून इंग्लंडविरुद्ध पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेत उतरेल. तत्पूर्वी, भारताचे तीन खेळाडू मालिकेआधीच दुखापतग्रस्त होऊन दौऱ्यातून बाहेर पडल्याने, निवड समितीने पृथ्वी शॉ व सूर्यकुमार यादव यांना इंग्लंडला पाठवण्याचा निर्णय घेतला आहे. ते लवकरच भारतीय संघाशी जोडले जातील. मात्र, सलामीवीर म्हणून इंग्लंड दौऱ्यावर निवड झालेल्या पृथ्वीमुळे आधीपासूनच इंग्लंडमध्ये भारतीय संघासह असलेल्या दोन सलामीवीरांवरील दबाव वाढला आहे.
हे खेळाडू झाले दुखापतग्रस्त
इंग्लंड विरुद्धच्या मालिकेपूर्वी युवा सलामीवीर शुबमन गिल, अष्टपैलू वॉशिंग्टन सुंदर व वेगवान गोलंदाज आवेश खान हे दुखापतग्रस्त झाल्याने मालिकेला मुकले आहेत. इंग्लंड दौऱ्यावर राखीव खेळाडू म्हणून गेलेला अभिमन्यू ईस्वरन याला मुख्य संघात निवडले गेले असून, सध्या श्रीलंकेत असलेल्या पृथ्वी शॉ व सूर्यकुमार यादव यांना देखील लवकरच बदली खेळाडू म्हणून इंग्लंडला पाठवले जाईल.
या दोघांवर वाढणार दबाव
इंग्लंडमध्ये असलेल्या भारतीय संघातील मधल्या फळीतील फलंदाज चांगली कामगिरी करत असल्याने सूर्यकुमारला कितपत संधी मिळेल याबाबत शंका आहे. परंतु, सलामीवीर म्हणून अंतिम ११ मध्ये केवळ रोहित शर्माची जागा नक्की आहे. त्यामुळे पहिल्या कसोटीत दुसरा सलामीवीर म्हणून मयंक अगरवाल याला अनुभवामुळे पहिली संधी मिळू शकते. तसेच, अभिमन्यू ईस्वरन यालादेखील पदार्पणाची प्रतीक्षा असेल.
सध्या तुफान फॉर्ममध्ये असलेला पृथ्वी इंग्लंडला जाणार असल्याने मयंक आणि अभिमन्यु यांच्यावर चांगली कामगिरी करण्याचा दबाव असेल. इंग्लंडविरुद्ध मायदेशात खराब कामगिरी केल्यानंतर मयंकला जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्यात संधी मिळाली नव्हती. परंतु, मागील आठवड्यात झालेल्या काउंटी एकादश संघाविरुद्धच्या सामन्यात मयंकने ४७ धावांची खेळी केली होती. चांगल्या सुरुवातीनंतर तो मोठी खेळी करण्यात अपयशी ठरलेला.
दुसरीकडे, अभिमन्यू ईस्वरनची भारतीय संघासोबत जाण्याची ही पहिलीच वेळ आहे. तो दौऱ्याच्या सुरुवातीला राखीव खेळाडू म्हणून सामील झालेला. मात्र, गिलच्या दुखापतीमुळे त्याला मुख्य संघात येण्याची संधी मिळाली. देशांतर्गत क्रिकेटमध्ये बंगालसाठी उत्कृष्ट कामगिरी त्याने केली आहे. पाच सामन्यांची मोठी मालिका असल्याने त्याला आपले आंतरराष्ट्रीय पदार्पण करण्याची संधी मिळेल.
महत्त्वाच्या बातम्या –
पोलार्ड-गेलसारखे धुरंधर असूनही २६ वर्षांपासून वनडे मालिकेत विंडीज कांगारूंकडून खातोय सपाटून मार
डॉमिनोजने दिलेला शब्द पाळला! मिराबाई चानूच्या घरी पाठवला पिझ्झा; वेटलिफ्टरनं ट्वीट करत दिला धन्यवाद