भारत आणि ऑस्ट्रेलिया संघादरम्यान ब्रिस्बेन येथील कसोटी सामना नुकताच पार पडला. या कसोटी सामन्यात भारतीय संघाने ऐतिहासिक विजय मिळवत बॉर्डर -गावसकर मालिका 2-1 अशा फरकाने जिंकली. भारताच्या या विजयाचा नायक ठरला तो यष्टिरक्षक रिषभ पंत. रिषभने सामन्याच्या पाचव्या दिवशी ऑस्ट्रेलियाच्या 328 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना शानदार 89 धावांची आक्रमक खेळी केली. रिषभने देखील ही खेळी विशेष असल्याचे म्हटले असून त्याने सर्व क्रिकेटप्रेमींचे आभार मानले आहे. यादरम्यानच रिषभने ब्रिस्बेन येथे खेळलेल्या विजयी फटक्याचे गुपित देखील उलगडले आहे.
रिषभ एका मुलाखतीदरम्यान म्हणाला, “जेव्हा मी शेवटचा फटका खेळला तेव्हा मला जाणवलं की चेंडू बॅटच्या तळाला लागलेला आहे. आउट फिल्ड अतिशय संथ असल्याने मी फटका खेळताच नवदीप सैनीला 3 धावा पाळण्यास सांगितल्या. मी विसरलो होतो की सैनीला दुखापत झालेली आहे. मी अतिशय वेगात धावत होतो. सैनीनेही एका पायाला दुखापत झाल्यानंतरही धाव घेतली होती.”
रिषभ पुढे म्हणाला, “पहिली धाव घेतांना मी डोळे बंद करत वेगात धावत होतो. जेव्हा मी दुसरी धाव घेण्यासाठी धावलो तेव्हा माझ्या लक्षात आले की ऑस्ट्रेलियन क्षेत्ररक्षक चेंडू मागे जात नाहीयेत. यानंतर मला समजले की चेंडू सीमारेषेजवळ गेलेला आहे. तेव्हा मला अत्यानंद झाला. हा खरोखरच एक मजेशीर प्रसंग होता.”
रिषभने सामन्याच्या पाचव्या दिवशी 138 चेंडूत 9 चौकार व 1 षटकारासह 89 धावांची आक्रमक खेळी केली. रिषभच्या या खेळीमुळेच भारतीय संघाला 328 धावांचे डोंगरा एवढे लक्ष पार करण्यात यश मिळाले. आपल्या आक्रमक खेळी साठी रिषभला सामनावीराचा पुरस्कार देखील घोषित करण्यात आला.
महत्त्वाच्या बातम्या –
भारतीय खेळाडूंविरुद्ध झालेल्या वर्णद्वेषी टीका प्रकरणाबाबत क्रिकेट ऑस्ट्रेलियाने दिले मोठे अपडेट
त्या जबरा फॅनचे मैदानावरुन ‘असे’ आभार मानत इंग्लंडने जिंकली सर्वांची मने, बघा व्हिडिओ
ऑस्ट्रेलियात ‘या’ गोष्टीचा फलंदाजी करताना झाला कायदा, वॉशिंग्टन सुंदरची प्रतिक्रिया