भारत आणि ऑस्ट्रेलिया संघादरम्यान नुकत्याच पार पडलेल्या बॉर्डर – गावसकर मालिकेमध्ये भारतीय संघाने ऐतिहासिक विजय मिळवला आहे. मालिकेतील पहिल्या सामन्यात मानहानीकारक पराभव स्वीकारावा लागल्यानंतर भारतीय संघासाठी पुढील वाटचाल अवघड मानली जात होती. नियमित कर्णधार विराट कोहलीची पालकत्व रजा व जवळजवळ दहा प्रमुख खेळाडूंची दुखापत भारतीय संघासाठी चिंतेची बाब ठरत होती. मात्र, या सर्व परिस्थितीतही कर्णधार अजिंक्य रहाणेने आपल्या नेतृत्व क्षमतेची चुणूक दाखवत भारतीय संघाला ऐतिहासिक विजय मिळवून दिला.
मालिका सुरू होण्यापूर्वी अजिंक्यच्या संघातील स्थानाबाबत अनेक प्रश्नचिन्ह उपस्थित होत होते. याबद्दल एका मुलाखतीदरम्यान बोलताना अजिंक्य म्हणाला, “अगदी खरे सांगायचे तर मला कधीही जाणवले नाही की माझी संघातील जागा धोक्यात आहे. कर्णधार आणि संघ व्यवस्थापनाला नेहमीच माझ्यावर पूर्ण विश्वास होता. हो, काही मालिकांमध्ये असे घडते की एखादा फलंदाज फॉर्ममध्ये नसतो. पण याचा असा अर्थ होत नाही की त्या खेळाडूचा दर्जा कमी झाला. फॉर्ममध्ये येण्यासाठी खेळाडूला केवळ एका चांगल्या खेळीची आवश्यकता असते.”
अजिंक्यने स्पष्ट केले की विराट कोहलीने नेहमीच त्याचे समर्थन केले आहे. अजिंक्य म्हणाला, “जेव्हा मी खराब फॉर्ममध्ये होतो तेव्हा विराटने माझा आत्मविश्वास वाढवला. जेव्हा तुम्हाला कर्णधाराचे समर्थन मिळते तेव्हा निश्चितच तुमच्या खेळावर त्याचा चांगला परिणाम होतो. कर्णधाराच्या समर्थनामुळे तुम्ही कुठलीही चिंता न करता केवळ उत्तम कामगिरी करण्यावर लक्ष केंद्रित करता.”
अजिंक्यने टीकाकारांना चोख प्रत्युत्तर देत मालिकेत आपल्या नेतृत्वासोबतच फलंदाजीत देखील उत्तम कामगिरी केली. मेलबर्न येथे खेळल्या गेलेल्या दुसऱ्या कसोटी सामन्यात अजिंक्यने शानदार शतक झळकावले होते. अजिंक्यने भारताच्या पहिल्या डावात 223 चेंडूत 12 चौकारांच्या मदतीने 112 धावा केल्या . अजिंक्यच्या या खेळीमुळेच भारतीय संघाने मेलबर्न कसोटी सामना जिंकला व मालिकेत जोरदार पुनरागमन केले.
महत्त्वाच्या बातम्या –
रिषभ पंतने सांगितले, ब्रिस्बेन कसोटीत विजयी फटका मारल्यानंतर ‘अशा’ होत्या भावना
भारतीय खेळाडूंविरुद्ध झालेल्या वर्णद्वेषी टीका प्रकरणाबाबत क्रिकेट ऑस्ट्रेलियाने दिले मोठे अपडेट
त्या जबरा फॅनचे मैदानावरुन ‘असे’ आभार मानत इंग्लंडने जिंकली सर्वांची मने, बघा व्हिडिओ
ट्रेंडिंग लेख –
‘ड्युरासेल’ म्हणून ओळखले जाणारे कर्टनी वॉल्श
अफलातून क्षेत्ररक्षक आणि उपयुक्त फलंदाज असूनही दुर्लक्षित राहिलेला मुंबईकर खेळाडू : रामनाथ पारकर
सेफ हँड्स! भारत विरुद्ध इंग्लंडच्या मालिकेत सर्वाधिक झेल घेणारे ‘हे’ आहेत टॉप पाच खेळाडू