आगामी टी20 विश्वचषकाच्या दहाव्या आवृत्तीला अवघे आठ दिवस उरले असतानाच माजी भारतीय क्रिकेटपटू संजय मांजरेकर यांनी या स्पर्धेच्या दर्जाबाबत मोठं विधान केलं आहे. त्यांच्या मते, टी20 विश्वचषकाला 50 षटकांच्या विश्वचषकाइतकं महत्त्व किंवा प्रतिष्ठा नाही आणि दोन्ही स्पर्धांकडे एकाच दृष्टीने पाहणं योग्य ठरणार नाही.
संजय मांजरेकर यांनी 1992 आणि 1996 च्या विश्वचषकात भारताचं प्रतिनिधित्व केलं होतं. त्या दोन्ही स्पर्धांमध्ये त्यांनी एकूण 11 सामने खेळले. आपल्या अनुभवाच्या आधारावर मांजरेकर म्हणतात की क्रिकेटमध्ये खऱ्या अर्थाने एकच विश्वचषक आहे आणि तो म्हणजे 50 षटकांचा विश्वचषक. ही स्पर्धा चार वर्षांतून एकदाच होत असल्यामुळे तिचं महत्त्व अधिक आहे, असं त्यांचं मत आहे.
टी20 विश्वचषक दर दोन वर्षांनी होतो, हीच बाब त्याचं महत्त्व कमी करते, असं मांजरेकरांनी स्पष्ट केलं. वारंवार होणारी स्पर्धा असल्यामुळे तिच्याभोवती तितकी मोठी उत्सुकता किंवा दीर्घकालीन तयारी लागत नाही, असंही ते म्हणाले.
सोशल मीडिया प्लॅटफाॅर्म X वर त्यांनी लिहिलं, “माझ्यासाठी ‘क्रिकेट वर्ल्ड कप’ म्हणजे कायमच 50 षटकांचा विश्वचषक. दोन वर्षांतून एकदा होणाऱ्या टी20 स्पर्धेला चार वर्षांतून एकदा होणाऱ्या विश्वचषकाइतकं स्थान देऊ नये. त्यामुळे मला आजही या स्पर्धेसाठी ‘वर्ल्ड टी20’ हेच नाव योग्य वाटतं.”
मांजरेकरांचं हे वक्तव्य अशा काळात आलं आहे, जेव्हा एकदिवसीय क्रिकेटचं भवितव्य चर्चेचा विषय ठरत आहे. एकेकाळी आंतरराष्ट्रीय क्रिकेटचा सर्वात लोकप्रिय प्रकार असलेला वनडे फॉरमॅट आता कसोटी आणि टी20 क्रिकेटच्या तुलनेत मागे पडताना दिसत आहे. अनेक क्रिकेट तज्ज्ञांच्या मते, 2027 मध्ये होणारा विश्वचषक हा शेवटचा वनडे विश्वचषक ठरू शकतो, जरी 2031 चा विश्वचषक भारत आणि बांगलादेशमध्ये होणार असल्याचं जाहीर झालं असलं तरी.
विशेष म्हणजे, टी20 स्पर्धेला सुरुवातीच्या सहा आवृत्त्यांमध्ये (2007 ते 2016) ‘वर्ल्ड टी20’ असंच नाव होतं. 2021 पासून तिला अधिकृतपणे ‘टी20 विश्वचषक’ असं संबोधलं जाऊ लागलं.
मांजरेकरांप्रमाणेच माजी भारतीय कर्णधार रोहित शर्मानेही अनेकदा 50 षटकांच्या विश्वचषकाला सर्वोच्च मान दिला आहे. त्यामुळेच 2023 मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध अंतिम सामन्यात झालेला पराभव आजही भारतीय चाहत्यांना बोचत आहे.






