भारतीय संघाला शनिवारी (२० ऑगस्ट) हरारे येथे झालेला झिम्बाब्वेविरुद्धचा दुसरा वनडे जिंकून देण्यात यष्टीरक्षक फलंदाज संजू सॅमसन याचा मोठा वाटा राहिला. संघाच्या ४ महत्त्वपूर्ण विकेट्स गेल्यानंतर संजूने उपयुक्त खेळी केली. त्याच्या या खेळीचे फळ त्याला सामनावीर पुरस्काराच्या रूपात मिळाले. सामनावीर बनत त्याने विश्वविक्रम आपल्या नावावर केला आहे. आजवर कोणत्याही भारतीय यष्टीरक्षकाला जे जमले नाही, असा पराक्रम त्याने करून दाखवला आहे.
झिम्बाब्वेच्या (Zimbabwe vs India) १६२ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना भारताने ९७ धावांवरच ४ विकेट्स गमावल्या. त्यानंतर संजूने भारतीय संघाचा मोर्चा सांभाळला. त्याने ३९ चेंडूत ४ षटकार आणि ३ चौकारांच्या मदतीने नाबाद ४३ धावा केल्या. ११०.२६ च्या स्ट्राईक रेटने त्याने धावा केल्या. तसेच त्याने २६ व्या षटकातील चौथ्या चेंडूवर भारतीय संघाला विजयासाठी १ धावांची गरज असताना माजी भारतीय यष्टीरक्षक एमएस धोनीप्रमाणे षटकार मारत सामन्याचा शेवट केला.
इनोसेंट काइयाच्या गोलंदाजीवर त्याने खणखणीत षटकार मारत दिमाखात भारतीय संघाला ५ विकेट्सने सामना जिंकून दिला. याबरोबरच भारतीय संघाने २-० ने वनडे मालिकेत विजयी आघाडीही घेतली.
विशेष म्हणजे, संजूने केवळ फलंदाजीनेच नव्हे तर त्याच्या यष्टीरक्षण कौशल्यानेही प्रभावित केले. त्याने झिम्बाब्वेच्या डावादरम्यान ३ फलंदाजांना यष्टीमागे झेलबाद केले. झिम्बाब्वेचे सलामीवीर कायतानो, काइया आणि माधवेरे यांना त्याने यष्टीमागे झेल टिपत बाद केले. तसेच डावाअंती व्हिक्टर न्याऊची याला धावबाद करण्यातही त्याचा हात राहिला.
या शानदार प्रदर्शनासाठी संजूला सामनावीर (Man Of The Match) पुरस्कार देऊन गौरवण्यात आले. यासह संजू झिम्बाब्वेत सामनावीर बनणारा पहिला भारतीय यष्टीरक्षक बनला आहे. त्याच्यापूर्वी कोणत्याही भारतीय यष्टीरक्षकाला हा पराक्रम करता आलेला नाही. ३५ वनडे खेळलेल्या धोनीनेही झिम्बाब्वेत ३ वनडे सामने खेळले होते. परंतु त्याला एकाही सामन्यात सामनावीर पुरस्कार जिंकता आला नव्हता.
महत्त्वाच्या बातम्या-
‘तुमच्या मध्ये माझं नाव कशाला?’ मोहम्मद आमीरने नेटकऱ्यांना विचारला खोचक सवाल
एकदाची भेट झालीच! केएल राहुलला आदर्श मानणाऱ्या झिम्बाब्वेच्या खेळाडूला अखेर भेटला भारतीय कर्णधार
आशिया चषकातून बाहेर झालेला आफ्रिदी कधी करणार पुनरागमन? जास्त दूर नाही तो दिवस