यंदाच्या टी२० विश्वचषक जिंकताना भारतीय संघाने अनेक नाट्यमय घटनांचा अनुभव घेतला. स्पर्धेपूर्वी, सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाला एक मजबूत दावेदार मानले जात होते. मात्र, भारतासाठी स्पर्धेची सुरुवात अपेक्षेनुसार झाली नाही. काही खेळाडू दुखापतींमधून परतत होते, तर काही फॉर्ममध्ये नव्हते.
भारताने गट टप्प्यातील सर्व चारही सामने जिंकले, ज्यात पाकिस्तान संघाविरुद्धचा मोठा सामना समाविष्ट होता. तरीही, संघाची कामगिरी एकसारखी दिसत नव्हती. कधी एका खेळाडूच्या बळावर तर कधी दुसऱ्याच्या कामगिरीवर सामने जिंकले गेले. इशान किशनने पाकिस्तानविरुद्ध चमक दाखवली, तर कर्णधार सूर्यकुमार यादवने संघाला अमेरिकेविरुद्ध विजय मिळवून दिला.
सुपर-८ फेरीत भारताला दक्षिण आफ्रिकेच्या संघाविरुद्ध ७६ धावांनी मोठा पराभव स्वीकारावा लागला. या पराभवानंतर, संघावर प्रचंड टीका झाली. मात्र, हा सामना भारतासाठी एक टर्निंग पॉइंट ठरला. प्रशिक्षक गौतम गंभीर आणि कर्णधार सूर्यकुमार यादव यांनी संघ रचना बदलण्याचा निर्णय घेतला आणि संजू सॅमसनला पुन्हा संधी दिली.
स्पर्धेपूर्वी सॅमसनचा फॉर्म चांगला नव्हता. त्याला काही मालिकांमध्ये संधीही मिळाली नव्हती, त्यामुळे अनेकांनी त्याच्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. मात्र, संघात परतताच, सॅमसनने त्याची खरी क्षमता दाखवून दिली.
त्याने झिम्बाब्वेच्या संघाविरुद्ध वेगवान सुरुवात केली. त्यानंतर, वेस्ट इंडिज क्रिकेट संघाविरुद्ध १९६ धावांच्या कठीण लक्ष्याचा पाठलाग करताना त्याने नाबाद ९७ धावा केल्या. उपांत्य फेरीत त्याने इंग्लंड संघाविरुद्ध ८९ धावा केल्या.
अंतिम सामन्यात, सॅमसनने न्यूझीलंड संघाविरुद्ध ८९ धावांची दमदार खेळी करून भारताच्या विजयातही महत्त्वाची भूमिका बजावली. तो स्पर्धेतील फक्त ५ सामन्यांमध्ये ३२१ धावा करून भारतासाठी सर्वाधिक धावा करणारा फलंदाज ठरला.
या शानदार कामगिरीसाठी, सॅमसनला “प्लेअर ऑफ द टूर्नामेंट” पुरस्कार देण्यात आला. सुरुवातीला ‘खोटे नाणे’ मानला जाणारा खेळाडू अखेर भारतासाठी ‘हुकूमाचा एक्का’ बनला.






