रणजी ट्रॉफी २०२२ (ranji trophy 2022) ची सुरुवात चांगल्या प्रकारे झाली आहे. ग्रुप स्टेजच्या पहिल्या सामन्यात काही संघांना विजय मिळाला, तर काही सामने अनिर्णीत राहिले. यापैकी मुंबई आणि सौराष्ट्र यांच्यातील सामन्यावर सर्वांच्या नजरा होत्या. या दोन संघात भारताचे दोन दिग्गज अजिंक्य रहाणे (ajinkya rahane) आणि चेतेश्वर पुजारा (cheteshwar pujara) आमने सामने होते. शेवटच्या दिवशी पुजाराने सौराष्ट्रसाठी दमदार खेळी केली, तर जयदेव उनादकट आणि चेतन साकरिया हे दोघे १० व्या विकेटसाठी शेवटपर्यंत खेळपट्टीवर कायम राहिले. या दोघांमुळे सौराष्ट्रने सामना अनिर्णीत राहिला.
अजिंक्य रहाणे आणि चेतेश्वर पुजारा यांना भारतीय कसोटी संघातून बाहेर केले गेले आहे. अशात रणजी ट्रॉफीतही हा पहिला सामना, या दोघांसाठी महत्वाचा होता आणि दोघांनीही चांगले प्रदर्शन करून दाखवले आहे. पहिल्या दिवशी रहाणेने मुंबईसाठी शतकी खेळी केली. तर पुजारा मात्र पहिल्या डावात अवघे चार चेंडू खेळून बाद झाला.
शनिवारी (२० फेब्रुवारी) बीसीसीआयने श्रीलंकेविरुद्धच्या आगामी कसोटी मालिकेसाठी संघ घोषित केला. पुजारा आणि रहाणे या दोन्ही दिग्गजांना या संघातून वगळले गेले. यानंतर रविवारी (२० फेब्रुवारी) पुजाराने ९१ धावांची खेळी केली आणि निवड समिताला जोरदार प्रत्युत्तर दिले.
या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना मुंबईने तब्बल ५४४ धावा केल्या होत्या. त्यानंतर सौराष्ट्र संघाचा पहिला डाव २२० धावांमध्ये गुंडाळला गेला. पुढे दुसऱ्या डावात सौराष्ट्रासाठी हार्विल देसाई आणि स्नेल पटेल या सलामीवीर जोडीने १६३ धावांची चांगली सुरुवात करून दिली. त्यानंतर चौथ्या क्रमांकावर आलेल्या पुजाराने १६ चौकार आणि एका षटकाराच्या जोरावर ९१ धावा केल्या आणि विकेट गमावली. असे असले तरी, तो रहाणेप्रमाणे शतक पूर्ण करू शकला नाही.
पुजारा बाद झाल्यानंतर सौराष्ट्र संघ एकापाठोपाठ विकेट्स गमावत गेला. संघाची धावसंख्या ३४१ असताना सौराष्ट्रने ९ विकेट्स गमावल्या होत्या आणि विजयासाठी मुंबईला फक्त एका विकेटची गरज होती. परंतु कर्णधार जयदेव उनादकट (३२) आणि चेतन साकरिया (१०) शेवटपर्यंत खेळपट्टीवर कायम राहिले आणि १० वी विकेट गमावली नाही. परिणामी मुंबईला पहिला सामना जिंकता आला नाही. पहिल्या डावात आघाडी घेतल्यामुळे मुंबईला ३ गुण मिळाले, तर सौराष्ट्रला १ गुण मिळाला.
महत्वाच्या बातम्या –
भारतीय संघात निवड होताच पठ्ठ्याने केली सामना वाचवणारी खेळी; श्रीलंकेविरुद्ध करू शकतो पदार्पण
मेहनत फळाला आली! मोठ्या प्रतीक्षेनंतर आवेश खानला मिळाली ‘इंडिया कॅप’
युएईत सुरू होणार नवी टी२० लीग! शाहरुखसह अदानी-अंबानी असणार संघमालक