वेस्ट इंडिजमध्ये सध्या १९ वर्षांखालील विश्वचषक (U19 World Cup) सुरू आहे. या स्पर्धेत भारतीय संघाने विक्रमी आठव्यांदा अंतिम सामन्यात प्रवेश केला आहे. भारताचा अंतिम सामना शनिवारी (५ फेब्रुवारी) इंग्लंडविरुद्ध होणार आहे. दरम्यान, १९ वर्षांखालील विश्वचषकातील एक असा विक्रम आहे, जो गेल्या १८ वर्षांपासून अबाधित आहे. विशेष म्हणजे हा विक्रम शिखर धवन (Shikhar Dhawan) या भारतीय खेळाडूने केला आहे.
शिखरचा विक्रम १८ वर्षांपासून शिखरचा अबाधित
शिखर २००४ साली १९ वर्षांखालील विश्वचषकात खेळला होता. त्यावेळी तो दमदार फॉर्ममध्ये होता. त्याने या स्पर्धेत ७ सामने खेळताना तीन शतके केली होती. विशेष म्हणजे तो एका १९ वर्षांखालील विश्वचषक स्पर्धेत तीन शतके करणारा त्यावेळी जगातील पहिलाच खेळाडू होता. त्याच्यानंतर इंग्लंडच्या जॅक बर्नहॅमने २०१६ साली झालेल्या १९ वर्षांखालील विश्वचषकात तीन शतके केली होती. आत्तापर्यंत शिखर आणि बर्नहॅम या दोघांनाच हा कारनामा करता आलेला आहे.
तसेच बर्नहॅमने देखील तीनच शतके केली असल्याने शिखरचा २००४ साली केलेला विक्रम अद्यापतरी अबाधित आहे. त्याचबरोबर यावर्षी देखील तो विक्रम मोडीत निघणार नाही. कारण, भारत आणि इंग्लंड या दोन्ही देशातील एकाही खेळाडूने २ शतके यावर्षीच्या स्पर्धेत केलेली नाहीत आणि आता केवळ अंतिम सामना शिल्लक असल्याने शिखर आणि बर्नहॅमचा हा विक्रम अबाधित राहाणार आहे.
भारताकडून २०२२ सालच्या १९ वर्षांखालील विश्वचषकात यश धूल, राज बावा आणि अंगक्रिश रघुवंशी या तिघांनी प्रत्येकी एक शतक केले आहे. विशेष म्हणजे शिखर धवन व्यतिरिक्त आत्तापर्यंत कोणत्याच भारतीय खेळाडूला १९ वर्षांखालील विश्वचषकाच्या एका स्पर्धेत दोन शतकेही करता आलेली नाही.
अधिक वाचा – असं काय झालं की शिखरच्या वडिलांनी सर्वांसमोर त्याच्या कानाखाली वाजवली, पाहा व्हिडिओ
शिखरचा युवा संघाकडून दमदार कामगिरी
शिखर धवनने १९ वर्षांखालील संघाकडून दमदार कामगिरी केली होती. त्याने २००४ साली झालेल्या विश्वचषकात ७ सामन्यांत ८४.१६ च्या सरासरीने ३ शतके आणि १ अर्धशतकासह ५०५ धावा केल्या होत्या. त्यावेळी त्याला मालिकावीर पुरस्कारानेही गौरविण्यात आले होते. महत्त्वाची गोष्ट अशी की २०२२ पर्यंत एका १९ वर्षांखालील विश्वचषकात सर्वाधिक धावा करण्याचा विक्रमही शिखरच्याच नावावर होता.
मात्र, १९ वर्षांखालील विश्वचषक २०२२ स्पर्धेत दक्षिण आफ्रिकेच्या डेवाल्ड ब्रेव्हिस याने शिखरचा हा विक्रम केवळ एक धावेने मोडला. त्याने ६ सामन्यांत ८४.३३ च्या सरासरीने ५०६ धावा केल्या. यात त्याने २ शतके आणि ३ अर्धशतके झळकावली आहेत. १९ वर्षांखालील विश्वचषकाच्या एका स्पर्धेत ५०० किंवा त्यापेक्षा अधिक धावा करण्याचा विक्रम शिखर आणि ब्रेव्हिस या दोघांव्यतिरिक्त आजपर्यंत कोणीही केलेला नाही.
तसेच २०२२ च्या स्पर्धेत भारतीय संघाकडून आत्तापर्यंत एकाही भारतीय खेळाडूला ३०० धावाही करता आलेल्या नाहीत. भारताकडून अंगक्रिशने सर्वाधिक २७८ धावा केल्या आहेत. असे असले तरी सांघिक कामगिरीच्या जोरावर भारतीय संघाने अंतिम सामना गाठला आहे.
भारताला ५ व्यांदा विश्वचषक जिंकण्याची संधी
यंदा भारतीय संघाने आठव्यांदा १९ वर्षांखालील विश्वचषकाची अंतिम फेरी गाठली आहे, तसेच आत्तापर्यंत भारताला ४ वेळा या स्पर्धेत विजेतेपद जिंकण्यात यश आले आहे. भारताने २०००, २००८, २०१२ आणि २०२० या चार वर्षी १९ वर्षांखालील विश्वचषक जिंकला आहे. त्यामुळे आता यश धूलच्या नेतृत्त्वाखाली खेळणाऱ्या भारतीय संघाला शनिवारी पाचव्यांदा विश्वचषकावर नाव कोरण्याची संधी असणार आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
आयपीएल स्पर्धेच्या एकाच हंगामात होणार ९४ सामने, बीसीसीआयची कमाई होणार दुप्पट; खेळाडूंना किती मिळणार?
मोलाचा सल्ला! वर्ल्डकप फायनलपूर्वी भारताच्या ‘यंगिस्तान’ला विराट कोहलीकडून मार्गर्दशन, फोटो व्हायरल