भारताचा माजी दिग्गज अष्टपैलू क्रिकेटपटू यूवराज सिंगने सोमवारी(10 जून) आंतरराष्ट्रीय क्रिकेट तसेच देशांतर्गत क्रिकेटमधून निवृत्ती घोषित केली आहे. त्याने मुंबईमध्ये त्याच्या या निवृत्तीची घोषणा केली. यावेळी त्याने त्याच्या कारकिर्दीतील अनेक महत्त्वाच्या क्षणांबद्दल तसेच महत्त्वाच्या व्यक्तींबद्दल भाष्य केले.
यामध्ये त्याच्यासाठी सर्वोत्तम कर्णधार कोण याबद्दल बोलताना तो म्हणाला, ‘मला वाटते सौरव गांगुली, ज्याच्या नेतृत्वाखाली मी पदार्पण केले. त्याने मला खूप पाठिंबा दिला. आणि एमएस धोनी, मी त्याच्याबरोबर अनेक मोठ्या स्पर्धा जिंकलो. त्यामुळे हे दोन कर्णधार सर्वोत्तम होते.’
गांगुलीबद्दल युवराज म्हणाला, ‘सौरव गांगुली त्याच्या खेळाडूंसाठी संघर्ष करण्यासाठी नेहमी पुढे असायचा. त्याला माझ्यासारखे आशिष नेहरा, झहिर खान, हरभजन सिंग आणि विरेंद्र सेहवाग असे काही खेळाडू संघात हवे होते. त्याने आम्हाला एकत्र घडवले.’
तसेच युवराज धोनीबद्दल म्हणाला, ‘एमएस धोनी हा दबावात खूप संतुलित असतो. तो यष्टीमागे आणि सामना कसा चालला आहे हे ओळखण्यात हुशार आहे. हे दोन कर्णधार खूप खास आहेत.’
युवराजने 3 ऑक्टोबर 2000 मध्ये चॅम्पियन्स ट्रॉफीच्या स्पर्धेतून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते.
त्याने त्याच्या कारकिर्दीत 40 कसोटी सामन्यात 1900 धावा आणि 9 विकेट्स घेतल्या आहेत. तसेच वनडेमध्ये 304 सामन्यात खेळताना 8701 धावा केल्या आहेत. यात त्याच्या 14 शतकांचा आणि 52 अर्धशतकांचा समावेश आहे. तसेच त्याने वनडेत 111 विकेट्सही घेतल्या आहेत.
त्याचबरोबर युवराजने 58 आंतरराष्ट्रीय टी20 सामन्यात 1177 धावा केल्या आहेत आणि 28 विकेट्स घेतल्या आहेत. युवराजने आयपीएलमध्ये 132 सामने खेळताना 2750 धावा केल्या आहेत आणि 36 विकेट्सही घेतल्या आहेत.
क्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.
महत्त्वाच्या बातम्या –