भारतीय संघाची सध्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यात कसोटी मालिका सुरु आहे. ४ सामन्यांच्या या कसोटी मालिकेतील पहिल्या २ सामन्यांनंतर १-१ अशी बरोबरी झाली आहे. आता तिसरा सामना सिडनी येथे ७ जानेवारीपासून खेळला जाणार आहे. मात्र त्याआधीच भारताला मोठा धक्का बसला आहे. भारताचा वेगवान गोलंदाज उमेश यादव उर्वरित दोन कसोटी सामन्यातून बाहेर पडला आहे. त्यामुळे आता त्याच्याऐवजी भारतीय संघात कोणाची निवड होणार याबाबत चर्चा सुरु आहे.
असे असले तरी सध्या वेगवान गोलंदाज टी नटराजनचे नाव उमेशची जागा घेण्यासाठी आघाडीवर आहे. त्याच्यापाठोपाठ शार्दुल ठाकूरचेही नाव या शर्यतीत आहे. त्याचबरोबर माध्यमातील वृत्तानुसार नटराजनला भारताच्या कसोटी संघात स्थान देण्यात आले आहे, पण तिसऱ्या कसोटी सामन्यात अंतिम ११ जणांच्या संघात शार्दुलला संधी दिली जाईल.
उमेशला मेलबर्न येथे दुसऱ्या कसोटीतील दुसऱ्या डावात गोलंदाजी करताना पोटरीची दुखापत झाली होती. याचाच परिणाम म्हणून त्याला मालिकेतून बाहेर पडावे लागले आहे.
बीसीसीआयच्या एका सुत्राने एका वृत्तसंस्थेला सांगितले की ‘टी नटराजनने दाखवलेल्या प्रदर्शनामुळे सर्वजण उत्सुक आहेत, पण आपण हे विसरुन चालणार नाही की त्याने तमिळनाडूसाठी केवळ एकच प्रथम श्रेणी सामना खेळला आहे. शार्दुल हा मुंबईचा अनुभवी गोलंदाज आहे.’
‘शार्दुलचे दुर्दैव होते की वेस्ट इंडिजविरुद्ध त्याच्या कसोटी पदार्पणावेळी तो एकही चेंडू टाकण्याआधीच दुखापतग्रस्त झाला. पण तो सध्या चांगल्या फॉर्ममध्ये असून उमेशची जागा घेऊ शकतो,’ असेही या सुत्रांनी सांगितले आहे.
पण उमेशची जागा कोणाला द्यायची याचा अंतिम निर्णय प्रशिक्षक रवि शास्त्री आणि कर्णधार अजिंक्य रहाणे, तसेच गोलंदाजी प्रशिक्षक भारत अरुण यांना घ्यावा लागणार आहे.
शार्दुलने ६२ प्रथम श्रेणी सामने खेळले असून त्याने २०६ विकेट्स घेतल्या आहेत. तसेच त्याने यंदाच्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यात १ वनडे आणि २ टी२० सामने खेळताना ५ विकेट्स घेतल्या आहेत. या व्यतिरिक्त नटराजनने याच ऑस्ट्रलिया दौऱ्यात वनडे आणि टी२० मध्ये पदार्पण करताना १ वनडे आणि ३ टी२० सामने खेळले आहेत. यात त्याने ८ विकेट्स घेतल्या आहेत. तसेच हे दोघेही मागील २ महिन्यापासून ऑस्ट्रेलियामध्ये आहेत. त्यामुळे आता या दोघांपैकी कोणाला संधी मिळते हे पाहावे लागेल.
भारताला गोलंदाजांच्या दुखापतीची चिंता –
सध्या भारतीय संघाला गोलंदाजांच्या दुखापतीची चिंता सतावत आहे. कारण ऑस्ट्रेलिया दौऱ्याआधीच इशांत शर्मा आणि भुवनेश्वर कुमार दुखापतग्रस्त होते. तर या दौऱ्यादरम्यान मोहम्मद शमी आणि उमेश यादव देखील दुखापतग्रस्त झाले आहेत. त्यामुळे सध्या वेगवान गोलंदाजीचा प्रमुख भार जसप्रीत बुमराहवरच आहे. बाकी सर्व नवे वेगवान गोलंदाज संघात आहेत.
महत्त्वाच्या बातम्या –
साल २०१३ मध्ये शेवटचा आंतरराष्ट्रीय सामना खेळणाऱ्या खेळाडूची ७ वर्षांनी निवृत्तीची घोषणा
कोरोना काळात गोलंदाजांसाठी ‘ही’ गोष्ट सर्वात कठीण, मार्क बाऊचरने मांडले मत
न्यूझीलंडचा ‘हा’ गोलंदाज दुसऱ्या कसोटीतून बाहेर, पाय फ्रॅक्चर झाला असूनही केलं होतं गोलंदाजीचं धाडस