भारतीय संघ सध्या न्यूझीलंडविरुद्ध टी-२० मालिका खेळण्यात व्यस्त आहे. ही पाच सामन्यांची टी-20 मालिका 31 जानेवारी रोजी संपेल, तर टी-20 विश्वचषक एका आठवड्यानंतर 7 फेब्रुवारी रोजी सुरू होईल. या स्पर्धेपूर्वी, टीम इंडिया एक महत्त्वाचा सामना खेळणार आहे. त्याबाबत महत्त्वाची बातमी समोर आली आहे. खरं तर, आगामी टी-20 विश्वचषकात आपले जेतेपद राखण्यापूर्वी, टीम इंडिया फक्त एक सराव सामना खेळेल, ज्यामध्ये त्यांचा सामना दक्षिण आफ्रिकेशी होण्याची शक्यता आहे. हा सराव सामना 4 फेब्रुवारी रोजी मुंबईतील डीवाय पाटील स्टेडियमवर खेळला जाईल.
भारत आणि न्यूझीलंडमधील सध्या सुरू असलेली मालिका 31 जानेवारी रोजी तिरुवनंतपुरममध्ये होणाऱ्या पाचव्या आणि शेवटच्या टी-20 सामन्याने संपेल. त्यानंतर, भारतीय खेळाडू 1 फेब्रुवारी रोजी तिरुवनंतपुरमहून रवाना होतील तर 3 फेब्रुवारी रोजी मुंबईत पुन्हा संघात सामील होतील. क्रिकबझच्या वृत्तानुसार, 7 फेब्रुवारीपासून सुरू होणाऱ्या टी20 विश्वचषकापूर्वी भारताचा हा एकमेव सराव सामना असेल. टीम इंडिया 7 फेब्रुवारी रोजी मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर आपल्या मोहिमेची सुरुवात करेल. आयसीसीने अद्याप अधिकृतपणे सराव सामन्यांचे वेळापत्रक जाहीर केलेले नसले तरी, सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखालील भारतीय संघ दक्षिण आफ्रिकेशी सामना करेल अशी बातमी आहे.
बीसीसीआय आणि क्रिकेट साउथ आफ्रिका (सीएसए) मधील सूत्रांनी या संभाव्य सामन्याची कबुली दिली आहे, परंतु आयसीसीची अधिकृत घोषणा न झाल्यामुळे ते पुष्टी करण्यास नकार दिला आहे. बांगलादेशने स्पर्धेतून माघार घेतल्याने आणि त्यांच्या जागी स्कॉटलंडचा समावेश केल्याने सराव सामन्यांचे वेळापत्रक लांबले आहे. आयसीसी 26 जानेवारी रोजी सराव सामन्यांची यादी जाहीर करेल अशी अपेक्षा आहे आणि त्यावेळी भारत-दक्षिण आफ्रिका सामना देखील निश्चित होऊ शकतो.






