विराट कोहलीच्या नेतृत्वातील वरिष्ठ भारतीय संघ सध्या इंग्लंड दौऱ्यावर आहे. उभय संघांमध्ये ४ ऑगस्टपासून पाच कसोटी सामन्यांची मालिका सुरू होईल. तत्पूर्वी भारतीय संघाने येथे काउंटी एकादश संघाविरुद्ध तीन दिवसीय सराव सामना खेळला. अपेक्षेप्रमाणे या सामन्याचा निकाल अनिर्णित राहिला. मात्र, सामन्यात भारतीय गोलंदाजांनी अप्रतिम कामगिरी केली.
पहिल्या डावात भारताची दमदार फलंदाजी
या सराव सामन्यात नेतृत्व करत असलेल्या भारतीय कर्णधार रोहित शर्माने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला होता. स्वत: रोहित व दुसरा सलामीवीर मयंक अगरवाल तसेच अनुभवी चेतेश्वर पुजारा अपयशी ठरल्यानंतर या सामन्यात यष्टीरक्षणाची जबाबदारी सांभाळणाऱ्या केएल राहुलने १५० चेंडूत १०१ धावांची दमदार खेळी केली. त्याला अष्टपैलू रवींद्र जडेजाने ७५ धावा काढत योग्य साथ दिली. या दोघांच्या खेळ्यांमुळे भारताने पहिल्या डावात ३११ धावा उभारल्या.
भारतीय गोलंदाजांची कमाल
जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्यात अपयशी ठरलेल्या भारतीय वेगवान गोलंदाजांनी या सामन्यात कमाल केली. उमेश यादव याने तीन तर, मोहम्मद सिराजने दोन गडी बाद केले. जसप्रीत बुमराह, शार्दुल ठाकुर, अक्षर पटेल व रवींद्र जडेजा यांना प्रत्येकी एक बळी मिळाला. काउंटी एकादशसाठी सलामीवीर हसिब हमीद याने ११२ धावांची खेळी केली. मात्र, तरी देखील संघ २२० पर्यंत मजल मारू शकला.
दुसऱ्या डावात भारतीय फलंदाजांचा सराव
भारतीय संघाने आपल्या दुसऱ्या डावात मयंक अगरवाल व चेतेश्वर पुजारा यांना सलामीला पाठवले. दोघांनी अनुक्रमे ४७ व ३८ धावा केल्या. जडेजाने पुन्हा एकदा अर्धशतक ठोकले. तर, हनुमा विहारी ४३ धावांवर नाबाद राहिला. भारताने आपला दुसरा डाव ३ बाद १९२ धावांवर घोषित केल्यानंतर, काउंटी एकादशच्या दुसऱ्या डावात ३१ धावा झालेल्या असताना सामना थांबवण्यात आला.
प्रमुख भारतीय खेळाडूंनी घेतली विश्रांती
या सामन्यात भारताचा नियमित कर्णधार विराट कोहली, उपकर्णधार अजिंक्य रहाणे, अनुभवी फिरकीपटू रविचंद्रन अश्विन व अनुभवी वेगवान गोलंदाज इशांत शर्मा सहभागी झाले नव्हते. युवा अष्टपैलू वॉशिंग्टन सुंदर व वेगवान गोलंदाज आवेश खान काउंटी एकादश संघाचा भाग होते. परंतु, दुर्दैवाने या दोन्ही खेळाडूंना या सामन्यात दुखापत झाली व ते दौऱ्यातून बाहेर पडले.
महत्त्वाच्या बातम्या-
केव्हा, कुठे आणि कसा पाहाल श्रीलंका विरुद्ध भारत संघातील तिसरा वनडे सामना? जाणून घ्या सर्वकाही
दुसऱ्या सामन्यातील पराभवानंतर अख्ख्या श्रीलंका संघाला ठोठावण्यात आला दंड, ‘हे’ आहे कारण