कोलकाता। भारत विरुद्ध वेस्ट इंडिज (India vs West Indies) संघात ईडन गार्डन्स येथे सुरू असलेल्या टी२० मालिकेत युवा सलामीवीर फलंदाज इशान किशन (Ishan Kishan) संघर्ष करताना दिसत आहे. विशेष म्हणजे या मालिकेपूर्वी त्याला आयपीएल २०२२ लिलावात मुंबई इंडियन्सने १५.२५ कोटी रुपयांमध्ये खरेदी केले आहे. पण त्यानंतर तो फारसा लयीत दिसलेला नाही. त्यामुळे अनेकजण त्याच्याऐवजी वेस्ट इंडिजविरुद्धच्या तिसऱ्या टी२० सामन्यासाठी ऋतुराज गायकवाड (Ruturaj Gaikwad) याला सलामीला संधी देण्याची मागणी करत आहेत. मात्र, याबद्दल आता माजी क्रिकेटपटू वासिम जाफर याने (Ishan Kishan) त्याचे वेगळे मत मांडले आहे.
जाफर म्हणतोय, संयम ठेवा
इशानने वेस्ट इंडिजविरुद्ध पहिल्या टी२० सामन्यात ४२ चेंडूत ३५ धावा केल्या होत्या, तसेच दुसऱ्या टी२० सामन्यात त्याने १० चेंडूत २ धावाच केल्या होत्या. त्यानंतर त्याच्याऐवजी ऋतुराजला संधी देण्याची चर्चा होऊ लागली. मात्र, याबद्दल बोलताना वासिम जाफरने म्हटले आहे की, इशानबाबत संयम ठेवायला हवा आणि ऋतुराजला श्रीलंकेविरुद्ध संधी द्यायला हवी.
जाफर ईएसपीएन क्रिकइन्फोशी बोलताना म्हणाला, ‘आपल्याला इशान किशनला अजून एका सामन्यात आणि तिसऱ्या टी२० सामन्यात खेळवण्याची गरज आहे. त्यानंतर आपण ऋतुराजला श्रीलंकेविरुद्धच्या मालिकेत संधी देण्याबद्दल विचार करायला हवा. त्याला पूर्ण मालिका द्यायला हवी. ऋतुराजला केवळ एका सामन्यात खेळवून उपयोग नाही. खेळाडूंसोबत सातत्य राखण्यात अर्थ आहे, जेणेकरून त्याला कळेल की तो संपूर्ण मालिका खेळणार आहे.’
जाफर पुढे म्हणाला, ‘आपल्याला इशान किशनबाबत संयम राखण्याची गरज आहे. आपल्या सर्वांनाच माहित आहे की, तो एक चांगला खेळाडू आहे. त्याने टी२० आणि वनडे पदार्पणात अर्धशतके केली आहेत. मुंबई इंडियन्सकडूनही खेळताना त्याची आकडेवारी चांगली आहे.’
त्याचबरोबर आयपीएल लिलावात मिळालेली मोठी किंमत पाहून थोडी चलबिचल होऊ शकते, असे मत जाफरने मांडले आहे. तो म्हणाला, ‘इशानला १५ कोटी रुपयांमध्ये खरेदी करण्यात आले आहे. ही गोष्ट खेळाडूच्या डोक्यात असते. त्यामुळे या गोष्टींसह पुढे जाणे सोपे नसते. चेंडू थोडा स्विंग होत होता, अगदी रोहिने देखील १९ धावा रन-अ-बॉल केल्या. आपल्याला इशानला एकटे सोडण्याची गरज आहे. एकदा तो स्थिर झाला की, सर्व ठिक होईल.’
तिसऱ्या टी२० सामन्यांत इशानची जागा पक्की
वेस्ट इंडिजविरुद्धच्या टी२० मालिकेतील अखेरच्या सामन्यातून विराट कोहली आणि रिषभ पंत यांना विश्रांती देण्यात आली आहे. त्यामुळे भारताकडे पंत ऐवजी यष्टीरक्षक फलंदाज म्हणून इशान किशनच पर्याय आहे. त्यामुळे इशानचे तिसऱ्या टी२० सामन्यात खेळणे जवळपास पक्के आहे. त्याचबरोबर विराटही सामन्यासाठी अनुपलब्ध असल्याने ऋतुराज गायकवाडलाही संधी मिळू शकते.
श्रीलंका संघ येणार भारत दौऱ्यावर
वेस्ट इंडिजविरुद्धची टी२० मालिका संपल्यानंतर भारताला श्रीलंकेविरुद्ध टी२० आणि कसोटी मालिका खेळायची आहे. श्रीलंका संघ भारत दौऱ्यावर येणार असून ३ टी२० आणि २ कसोटी सामने खेळणार आहे. भारत आणि श्रीलंका यांच्यात २४ ते २७ फेब्रुवारी दरम्यान टी२० मालिका होणार आहे, तर ४ ते १६ मार्च दरम्यान कसोटी मालिका खेळवली जाणार आहे. यातील टी२० मालिकेसाठी इशान किशन आणि ऋतुराज गायकवाड या दोघांचीही भारतीय संघात निवड झाली आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
ऑस्ट्रेलियात होणाऱ्या टी२० विश्वचषकासाठी भारतीय संघाची आहे ‘ही’ योजना, रिषभ पंतचा खुलासा
रोहितचा उत्तराधिकारी म्हणून पंत, केएल आणि बुमराहचा पर्याय, पण कोण होऊ शकतो चांगला कर्णधार?
बुमराहला मागे टाकत चहल बनणार भारताचा सर्वात यशस्वी टी२० गोलंदाज, फक्त करावे लागेल ‘हे’ काम